औरंगाबाद – मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट ईडीकडून होणाऱ्या कारवायांवर टीका करत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, खोटेनाटे आरोप केल्यास त्यांचे कुटुंब कुठल्या अवस्थेतून जातात याचा विचार केला पाहिजे. तत्त्वाची लढाई आणि विरोध झाला पाहिजे. पण इतकी टोकाची कटुता निर्माण होता कामा नये. नोटीस दाखवा. रेड करा आमचे काहीही म्हणणे नाही, असे सांगतानाच आमच्या अनिल देशमुख यांच्यावर सात वेळा रेड पडली. इतक्या रेड असतात का?, असा सवालही त्यांनी केला. माणूस आमच्याकडे असला की देशद्रोही आणि त्यांच्याकडे असला की धुवून निघतो, असा चिमटाही त्यांनी काढला.
प्रेस हाऊसवर सुद्धा रेड
ईडी कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? हे कोणत्या आधाराने बोलातात? हे काय सीपी किंवा आयजी आहेत की ईडीचे अध्यक्ष आहेत का? मग हे कसे बोलतात?, असा सवाल करतानाच पाच दशकात आमच्यावरही आरोप झाले. पण आमची तयारी आहे. इतकी कटुता येणे योग्य नाही. आमच्या विरोधात ट्रक भर पुरावे आणले पण काय झाले? असा सवालही त्यांनी केला. तसेच प्रेस हाऊसवर सुद्धा रेड होते. त्यांना नोटीस दिली जाते, याकडेही सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले.