श्रीलंकेत राष्ट्रपती निवडणुकीनंतर संचारबंदी लागू, जाणून घ्या काय आहे प्रकरण

कोलंबो : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर श्रीलंकेत अचानक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आज रात्री १० ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, असे श्रीलंकेच्या पोलिसांनी सांगितले. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी राजपत्र जारी करून कर्फ्यू आदेश लागू केला आहे. मतमोजणी सुरू असताना संचारबंदी जाहीर करण्यात आली. मात्र, अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. मात्र या काळात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होऊ शकतो –
श्रीलंकेतील निवडणुकीचे निकाल रविवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय निवडणूक देखरेख संस्थांचे 116 प्रतिनिधी श्रीलंकेत पोहोचले आहेत. 78 निरीक्षक युरोपियन युनियन म्हणजेच EU मधील आहेत. ईयूने यापूर्वी सहा वेळा श्रीलंकेत निवडणुकीचे निरीक्षण केले आहे. श्रीलंकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या यशाच्या जोरावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
तिरंगी निवडणूक लढतीत 75 वर्षीय विक्रमसिंघे यांना नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) च्या 56 वर्षीय अनुरा कुमारा दिसानायके आणि 57 वर्षीय समगी जना बालावेगया (SJB) नेते सजीथ प्रेमदासा यांचे मोठे आव्हान आहे.





