तीस टक्क्यांवरून कंपनी कर आता 25.17 टक्के
कर सवलतींमुळे सरकारी महसुलात येणार 1 लाख 45 हजार कोटींची घट
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंदीच्या झळा सोसणाऱ्या उद्योग क्षेत्राला काहीसा दिलासा देताना कंपनी करात मोठी सुट जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या तीस टक्के इतका असलेला कंपनी कर आता 25.17 टक्के इतका करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारला वार्षिक 1 लाख 45 हजार कोटी रूपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. गेले अनेक दिवस उद्योग क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मोठ्या सवलती दिल्या पाहिजेत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्याचा विचार करून ही सवलत जाहीर करण्यात आली असून उद्योग क्षेत्राला अन्यही काही अनुषंगिक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. ही सवलत 1 एप्रिल 2019 पासून लागू धरण्यात येणार आहे.
देशी उद्योगाने अन्य कोणत्याही सवलती घेतल्या नसतील तर त्यांच्यासाठी हा कंपनी कर 22 टक्के इतका राहणार आहे. इन्कम टॅक्स ऍक्ट आणि फायनान्स ऍक्ट मध्ये अध्यादेशाद्वारे बदल करून या सवलती लागू केल्या जाणार आहेत. आयकराच्या 22 टक्के वर्गवारीत येणाऱ्या कंपन्यांना आता मिनीमम अल्टरनेटीव्ह टॅक्सही आता लागू केला जाणार नाही. ज्या उद्योगांना करमाफी लागू आहे त्यांच्या करमाफीची मुदत संपल्यानंतर ते उद्योग आता कमी आयकर दरासाठीही सरकारकडे अर्ज करू शकतील अशी माहितीहीं श्रीमती सीतारामन यांनी दिली. उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या सवलती देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.