नवी दिल्ली – दहशतवादाच्या विरोधात मोदी सरकारने स्वीकारलेले झिरो टॉलरन्सचे धोरण सुरूच ठेवण्याची सुचना नवे गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांना केली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. दहशतवादाच्या संबंधात हे धोरण राबवताना कितीही टीका झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करा आणि त्या टीकेचा प्रभाव आपल्यावर पडू देऊ नका अशी सुचनाही त्यांनी केली आहे.
आपल्या मंत्रालयाच्या कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर वरीष्ठ अधिकाऱ्यांची शहा यांनी बैठक घेतली होती त्या बैठकीत त्यांनी ही सुचना केल्याचे सांगण्यात येते. काश्मीरच्या संबंधातील ठोस धोरण येत्या दोन महिन्यात निश्चीत केले जाईल तो पर्यंत दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई सुरूच ठेवण्याची सुचनाही त्यांनी केली आहे. गेल्या पाच महिन्यात काश्मीर खोऱ्यात सुमारे 101 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
तथापी असे असले तरी काश्मीर खोऱ्यातील युवक दहशतवादाकडे वळण्याचे प्रमाण कमी झालेले नाही ही एक चिंतेची बाब आहे. अलिकडेच खोऱ्यातील पन्नास युवक दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी त्यांच्याशी संलग्न झाले आहेत असेही वृत्त लष्करी सूत्रांनी दिले आहे. पण काश्मीर विषयीचे धोरण येत्या दोन महिन्यात ठरवले जाणार असून त्यासाठी दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.