नवी दिल्ली – सध्याच्या देशातील राजकीय धृवीकरणाच्या वातावरणावर उपाय म्हणून राजस्थानातील चिंतन शिबिरात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भारत जोडो अभियानाची घोषणा केली होती. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाची सुरुवात केली जाणार असून त्याच्या तयारीच्या संदर्भातील एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीसाठी सर्व सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांना बोलावण्यात आले आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत संपूर्ण भारत जोडणे हा यामागचा उद्देश असून बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. या अगोदर या विषयावर कॉंग्रेसची एक बैठक झाली होती व त्यात पक्षाचे नेते राहुल गांधी सहभागी झाले होते. मात्र गुरुवारच्या बैठकीत राहुल उपस्थित नसतील कारण सध्या ते विदेश दौऱ्यावर गेले आहेत.
महाराष्ट्राला राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार; 2 कोटींची प्रोत्साहनपर रक्कमही प्रदान
कॉंग्रेसमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार भारत जोडो अभियानांतर्गत 3500 किमीची यात्रा काढली जाणार असून कन्याकुमारी येथून सुरू होणारी ही यात्रा 12 पेक्षा जास्त राज्यांतून जाईल. काश्मीरमध्ये यात्रेचा समारोप होईल. पदयात्रा, रॅली आणि मेळावे असे अभियानाचे स्वरूप असेल व त्यात सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचाही सहभाग असेल. समविचारी पक्ष, संघटना आणि संस्था व व्यक्तीही अभियानात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.