मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खेडच्या गोळीबार मैदानावर उत्तरसभा घेतली. याच मैदानावर दोन आठवड्यांपूर्वी 5 मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर आसूड ओढला होता. त्याला आता मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं आहे. सभा घेऊन उद्धव ठाकरेंच्या सगळ्या आरोपांना जशास तसं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं आहे. या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतंच पण उद्धव ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष सत्तेसाठी काँग्रेसकडे गहाण टाकला. आम्ही तो सोडवण्याचं काम केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडच्या सभेत म्हणाले आहे. तसंच उद्धव ठाकरेंच्या डोक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळंच बदललं.
अशोक चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात की त्यांनी शेण खाल्लं आता त्यांच्याच पंक्तीत बसून तुम्ही काय खाताय? असा सवाल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विचारला आहे.
दरम्यान, कालच्या या सभेत योगेश कदम, उद्द्योगमंत्री उदय सामंत, गजानन कीर्तीकर, रामदास कदम, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भाषणे झाली. या सभेत ‘लावरे तो व्हिडीओ…’ म्हणत, मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांच्याबाबत केलेली व्यक्तव्ये उपस्थितांना दाखवली.