मुंबई – महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगारीसह राज्यातील विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडीच्या वतीने उद्या, 17 डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पोलिसांची परवानगी मिळाली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचे पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. तसेच लाऊडस्पीकर, वाद्य वाजविणे यासाठी महापालिका आणि वाहूतक पोलीस विभागाकडून परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीने येणाऱ्या १७ डिसेंबर मुंबई येथे राज्यद्रोहींविरोधी हल्लाबोल मोर्चाचे अयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा प्रयत्न, आमच्या महापुरुषांवर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महागाई, 1/2 pic.twitter.com/6yjlKv7TlT
— NCP Mumbai (@MumbaiNCP) December 16, 2022
महाराष्ट्रातील विविध समस्यांवरून महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा राणीबाग ते आझाद मैदान असा निघणार होता. मात्र, आता मार्ग बदलण्यात आला असून रिचर्डसन क्रुडास मिल ते टाईम्स ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. यानंतर मविआतील नेत्यांची जाहीर भाषणे होणार आहे.
या मोर्चासाठी सर. जे.जे मार्ग नागपाडा अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभागाकडून परवानगी मागितली होती. पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. या मोर्चाला आडकाठी केली जाणार नाही, असे गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मोर्चाच्या मार्गावर तिन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज आहे.
मविआचा मोर्चा शांतपणे व्हावा. त्या मोर्चाला जी काही परवानगी हवी आहे, ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मला वाटते की, लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल, तर ते विरोध करतील. फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे, यासाठीच केवळ सरकारचा हस्तक्षेप असेल.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता – शरद पवार
राज्यासह देशात महागाई, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सातत्याने आक्षेपार्ह विधान करण्यात आली. जबाबदार लोकांनी केलेली ही विधान सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
काय आहेत नियम?
– मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रे, लाठी, पुतळे वगैरे घेऊन जाण्यास मनाई आहे.
– कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा येणार नाही याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.
– कर्तव्यावरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या कायदेशीर आदेशाचे पालन मोर्चामधील लोकांनी करावे.
– मोर्चामध्ये फटाके वगैरे वाजवण्यास प्रतिबंध.
– मोर्चा दिलेल्या मार्गावरूनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये.
– मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.
– मोर्चामध्ये अश्लील हावभाव, अंगविक्षेप करू नये
असा असणार पोलीस बंदोबस्त
महामोर्चाला दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात दोन अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह 8 ते 10 पोलिस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चात एसआरपीएफच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलीस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.