हैदराबाद – भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन नावाची करोनावरील लस विकसित केली असून भारत सरकारने या लसीचे 55 लाख डोस विकत घेण्याची ऑर्डर कंपनीला दिली आहे. ही लस घेतल्यानंतर कोणाला त्याचे साईड इफेक्ट दिसून आल्यास संबंधीत इसमाला त्याची नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा भारत बायोटेक कंपनीने केली आहे. ही लस घेणाऱ्याकडून जे संमती पत्रक घेतले जाते त्यातच कंपनीने म्हटले आहे की लस घेतल्यानंतर त्याचे काहीं गंभीर परिणाम किंवा काहीं साईड इफेक्ट्स संबंधीत रूग्णावर आढळून आल्यास त्याच्यावर सरकार मान्य वैद्यकीय केंद्रे, रूग्णालये या ठिकाणी वैद्यकीय उपचार केले जातील. तसेच गंभीर परिणाम झालेल्या व्यक्तिला नुकसान भरपाई दिली जाईल असेही कंपनीने नमूद केले आहे. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स यशस्वीरित्या पुर्ण झाल्या आहेत. तथापि या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनीकल ट्रायल्सच्या चाचण्यांचे निष्कर्ष अद्याप येणे बाकी आहे. लस घेतल्यानंतर करोनाच्या संबंधातील काळजी घेणेही आवश्यकच आहे असेही कंपनीने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या औषध प्रशासनाने या लसीला तातडीची व आणीबाणीची बाब म्हणून मर्यादित स्वरूपात वापर करण्यास अनुमती दिली आहे.