LPG Cylinder Price Hike : आजपासून नवीन महिना सुरू झाला असून, 1 मे महाराष्ट्र दिनादिवशीच सिलिंडराच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 993 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ होणार असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. नवीन दरांनुसार, दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 3071.50 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत हा दर सुमारे 3024 रुपये, तर कोलकात्यात अंदाजे 3201.50 रुपये झाला आहे. ही नवीन दरवाढ 1 मे म्हणजेच आजपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सामान्य घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तज्ञांच्या मते, व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स त्यांच्या पदार्थांच्या दरात वाढ करू शकतात. त्यामुळे बाहेरचे खाणे-पिणे महाग होण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे खाद्य उद्योग, ढाबे आणि केटरिंग व्यवसायात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधताना व्यावसायिकांना अडचणी येऊ शकतात आणि त्याचे परिणाम ग्राहकांनाही बसू शकतो. इराणमधील तणाव आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’जलमार्गाच्या संभाव्य नाकेबंदीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात इंधनाच्या किंमतींमध्ये कधी आणि किती चढ-उतार होतील, यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आजपासून एलपीजी सिलेंडरच्या गॅस बुकिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंत ग्राहकांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नियमांचे पालन करावे लागणार आता नवीन गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ठराविक दिवसांचे अंतर असणे अनिवार्य आहे. शहरात राहणाऱ्या ग्राहकांना 21 ते 25 दिवसांनंतरच नवीन बुकिंग करता येईल. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी 45 दिवसांचा असणार आहे. गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना आता ओटीपी (OTP) देणे बंधनकारक असेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी दिल्याशिवाय सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही. उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण नसल्यास गॅस पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय तणावामुळे गॅसच्या किमतीतही बदल झाला आहे. हेही वाचा : Raj Thackeray : ‘महाराष्ट्राचे वाटोळे झालं त्याला राजकीय नेते जबाबदार’; राज ठाकरेंचं मोठं विधान