शंकर दुपारगुडे
कोपरगाव – कोपरगाव तालुक्यात प्रत्येक घराघरात अन् घरातील बहुतांशी सदस्य सर्दी खोकल्याने बेजार झाले आहेत. घराबाहेर बोचरी थंडी, अचानक येणारा गार वारा, मध्येच ऊन सावलीचा खेळ, कधी सुर्याची प्रखर किरणांनी थोडासा दिलासा वाटला, कि लगेच सुर्य मावळतीचे वातावरण. अशा पद्धतीने सध्या वातावरणात कमालीचे बदल होत आहेत. धुळीचे कण, बोचऱ्या थंडीने तालुक्यातील नागरीकांचे शारीरिक स्वास्थ्य बिघडले आहे. अनेक गावात नागरिक सर्दी खोकल्याने बेजार झाल्याचे चित्र दिसत असून खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच दिसत आहे. काही रुग्णालयांमध्ये तर चक्क रुग्णांच्या रांगा देखील दिसत आहेत.
काही घरामध्ये सर्वच सदस्य एकाचवेळी आजारी पडून घरातील कोपऱ्यात बसुन खोकल्याची स्पर्धा लावल्यासारखे खोकत आहेत. घशात खवखव होवून खोकल्याच्या उबाळ्यावर उबाळ्या येवून नागरिक खोकुन व्याकुळ होत आहेत. नवा आलेला आजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मतानुसार घातक नसला तरी त्रासदायक आहे. वेळेवर औषध घेवून योग्य पथ्य पाळले तर अवघ्या चार-पाच दिवसांत रुग्ण बरे होतात, असे सांगत असले तरी करोनाच्या भितीने नागरीक हवालदिल झाले.
दरम्यान, पहिल्यांदा तालुक्यात इतक्या मोठ्या सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. जिथे जावे तिथे सर्दी खोकल्याचे रुग्ण दिसत आहेत. भर दिवसा नागरिक उबदार कपडे घालुन घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी दिवसा शेकोट्या पेटल्या तर काहींनी घरात हिटर लावून वातावरण गरम करीत आहेत.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले की, सद्याची स्थिती गंभीर असली तरी जीवाला घातक नाही. अचानक वातावरणातील झालेल्या बदलामुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. सर्दी त्वरीत कमी होईल, मात्र खोकला दहा दिवसापेक्षा अधिक दिवस राहु शकतो. वेळेवर योग्य औषधोपचार घेवून थंडी वाऱ्यात घराबाहेर पडू नये. घरातील एका व्यक्तीला लागण झाली तर संपूर्ण कुटुंबाला याची लागण होते.
तेव्हा योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही डॉक्टर सर्दी, खोकला लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना सध्या घरी उपचार घेण्याचा सल्ला देत असून करोनाची तपासणी केली तरी त्यांचा अहवाल बाधित येणार आहे. तेव्हा योग्य औषधोपचार घ्या आणि घरीच बसा असा सल्ला मिळत असल्याने करोना बाधितांचा शासकीय आकडा घटला असला तरी सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरात दिसून येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढल्याने तालुक्यात डॉक्टर देखील आता हैराण झाले आहे. खासगी व सरकारी रुग्णालयात केवळ सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.त्यात करोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने नागरिक तपासणी करण्याचे टाळत आहे.