नवी दिल्ली – रशियाने भारताला सीएनजी पुरवठ्याचे करार केले होते. मात्र जागतिक पातळीवरील काही अडचणीमुळे रशियाच्या सीएनजीची पाच जहाजे भारतापर्यंत पोहोचू शकली नाहीत. प्राप्त माहितीनुसार जी कंपनी भारताला सीएनजीचा पुरवठा करणार होती त्या कंपनीच्या गॅस वाहतुकीवर जागतिक निर्बंधाचा परिणाम झाला असल्याचे बोलले जाते.
रशियातील गाझाफ्रॉम या गॅस निर्माण करणाऱ्या कंपनीचे सिंगापूर येथे कार्यालय आहे. सिंगापूर येथील कंपनीच्या कार्यालयाने भारतातील गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडियाबरोबर वर्षाला 2.85 दशलक्ष टन गॅस पुरवठ्याचा करार केला आहे. मात्र जून महिन्यापासून या कंपनीकडून भारताला गॅस पुरवण्यात आलेला नाही. आतापर्यंत पाच जहाजे येण्याचे अपेक्षा होती. मात्र ही जहाजे भारतीय किनाऱ्यावर आली नाहीत.
दोन्ही कंपन्यादरम्यान झालेल्या करारानुसार जर ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गॅसचा पुरवठा झाला नाही तर भविष्यामध्ये ती तूट भरून काढण्याची तरतूद आहे. मात्र रशियाच्या कंपनीने भविष्यात कधी गॅस उपलब्ध करू याची माहिती भारतीय कंपनीला दिलेली नाही. त्यामुळे या क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारतामध्ये अगोदरच सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. या कंपनीने गॅस पुरवलेला नाही आणि भविष्यात पुरवणार की नाही याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये सीएनजीच्या किमती वाढतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
हा प्रकार घडल्यानंतर गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्यपूर्व आणि अमेरिकेकडून हा गॅस मिळविण्यासाठी विचार करीत आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांनी रशियातील 31 कंपन्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे रशियातून होणाऱ्या गॅस आणि इतर वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
रशियातील या कंपनीकडून गॅस ऑथेरिटी ऑफ इंडियाला 2022 मध्ये 40 जहाजाची अपेक्षा होती. मात्र आता जूनपासून गॅस घेऊन येणारी जहाजे बंद झाली आहेत. रशियावर अमेरिकेने निर्बंध घातल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढविली आहे. याबाबत भारतावर टीका होत असूनही भारताने या टिकेकडे दुर्लक्ष केरीत असल्याचे दिसून येते.