CJI Bhushan Gavai attack : हल्ला करणाऱ्या वकीलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; जेजुरीत विविध संघटनांकडून मागणी

प्रभात वृत्तसेवा
जेजुरी – सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीशपद हे सर्व भारतीयांसाठी आदराचे, सन्मानाचे पद आहे, मात्र या पदावर विराजमान असलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा संविधानावर आणि निकोप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार असून या मनुवादीवृत्तीच्या वकीलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच फेसबुक आणि ट्विटरवर हल्ल्याच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जेजुरी आरपीआयसह ,संभाजी ब्रिगेड , शिवसेना (शिंदे गट ), मनसे, बहुजन हक्क परिषद , दलित पँथर आदी संघटनांच्या पदाधिकारी व भीम अनुयायांनी केली आहे.
शुक्रवारी (दि.१०) जेजुरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरपीआयचे पंढरीनाथ जाधव, गौतम भालेराव, तानाजी भालेराव, मृणाल जाधव, संतोष भालेराव, सारंग सोनवणे, खंडेराव भालेराव, अमोल भालेराव, विजय भालेराव, प्रशांत नाझरेकर, माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव, संभाजी ब्रिगेडचे संदीप जगताप, शिवराज झगडे, शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे, मनसेचे उमेश जगताप, बहुजन हक्क परिषदेचे यशवंत दोडके, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, दलित पँथरचे जाफर सय्यद उपस्थित होते.यावेळी पोलीस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पंढरीनाथ जाधव यांचेसह आरपीआय कार्यकर्त्यांनी केले.





