नवी दिल्ली – सध्याच्या परिस्थितीत बॅंकिंग व्यवहार सुरळीत चालणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर नागरिकांना पैसे उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना पैशाची चणचण भासणार नाही. यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, सर्व बॅंकर्सना आम्ही या काळात सर्व सेवा व्यवस्थित चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर जाताना अडचणी येत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपण यासंदर्भात उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या काळात नियमीत कर्मचाऱ्याबरोबरच एटीएम कर्मचाऱ्यांनाही काम करावे लागत आहे. त्यांची वाहतूक सुरळीत होण्याची गरज आहे.
गेल्या पंधरा दिवसात देशातील बॅंकांच्या शाखानी उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे नागरिकांना कसल्याही अडचणी आल्या नाहीत असे त्या म्हणाल्या. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने गरीब लोकांना बॅंकांमध्ये काही रक्कम टाकण्याचे जाहीर केले आहे. पुढील आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. या काळात बॅंकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
देशभरातील बॅंक कर्मचाऱ्यांनी या काळामध्ये स्वतः धोका पत्करुन काम चालू ठेवले आहे. त्याबद्दल सीतारमण यांनी त्यांच्या कामाची वाखाणणी केली. देशभरात सध्या एक लाख 5 हजार 988 शाखांमध्ये काम चालू आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी काम सुरू झाल्यानंतर बॅंक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले.