Nilesh Pardhye’s post : ‘चिमणे, परत ये, खूप काही सांगायचं…’, रोहिणीच्या आठवणीत पती निलेशची भावूक पोस्ट
Nilesh Pardhye's post : या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही तिचा पती निलेश पारध्ये पत्नीच्या आठवणीत व्याकूळ झाला आहे. त्याने फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत.

Nilesh Pardhye’s post : सोलापूरमधील लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पारध्ये हिने आपल्या हॉटेल ‘ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. अथक परिश्रमातून उभे केलेल्या व्यवसायाचे स्वप्न, सोशल मीडियावर मिळालेली लोकप्रियता आणि प्रेमळ संसार अशा सर्व गोष्टी सुरळीत सुरू असतानाच रोहिणीच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही तिचा पती निलेश पारध्ये पत्नीच्या आठवणीत व्याकूळ झाला आहे. त्याने फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. “चिमणे, परत ये गं… तुला खूप काही सांगायचं बाकी आहे,” अशा शब्दांत त्याने पत्नीला आर्त साद घातली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण निलेशचे सांत्वन करत आहेत.
निलेशने आपल्या पोस्टमध्ये रोहिणीच्या संघर्षमय आणि समर्पित स्वभावाची आठवण सांगितली आहे. “या पाच वर्षांच्या सहजीवनात तिने केवळ साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती कष्ट घेतले, किती हाल सोसले, याची गणतीच नाही.” असे त्याने लिहिले.
हेही वाचा : Swapnil Joshi : ‘सॉरी सॉरी…’! बाळ रडताच स्वप्नील जोशीने नाटक थांबवलं; ‘त्या’ कृतीने होतोय कौतुकाचा वर्षाव
पुढे तो म्हणतो, “जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला धीर द्यायची. जेव्हा सगळे दूर जायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं. आता चांगले दिवस सुरू झाले होते, आपल्या स्वप्नांना आकार मिळत होता; पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस.”
रोहिणीच्या आठवणींनी भारावलेल्या निलेशने पोस्टच्या शेवटी लिहिले, “आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं प्रेम आणि काळजी सतत डोळ्यासमोर उभी राहते. चिमणे, परत ये गं… तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय. तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक आठवणीत कायम जिवंत राहशील.”
निलेशची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी रोहिणीला श्रद्धांजली वाहत पारध्ये कुटुंबाला धीर दिला आहे.
रिलस्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे. सगळं सुरळीत सुरू असताना असं नेमकं काय घडलं ज्यामुळे रोहिणीला आपल्या आयुष्याचा शेवट करावा लागला याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आता तपासाला गती दिली आहे. रोहिणीचा पती निलेश पाराध्येच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी आणि तिचे पती निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर त्यांनी पुण्यात काही काळ घालवण्यानंतर आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गावी परतल्यानंतर त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावाने हॉटेल व्यावसायाला सुरूवात केली.
आर्थिक अडचणींचा सामना
तिथेही दोघे रिल्स तयार करत होते. पण, बऱ्याच वेळी रिल्समधूनही दोघांमध्ये वादाचे काही प्रसंग घडले होते. अलीकडे दोघांनी मंगळवेढा तालुक्यातच दोन ठिकाणी नव्याने हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. मात्र या दोन्ही शाखांमध्ये आर्थिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. महत्वाचे म्हणजे, रोहिणीचा निलेश सोबतचा दुसरा विवाह आहे. आता या प्रकरणात आणखी कोणती नवी माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा : Ankur Wadhave : ‘चला हवा येऊ दे फेम’अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला? पोस्ट अन् व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?





