Child Psychology: घरात दुसरं बाळ आलं आणि मोठं मूल अस्थिर झालं तर काय करावं ? समुपदेशक सांगतात, ‘आधी….’
Child Psychology घरात नवीन बाळ येणार ही बातमी ऐकली की सगळं घर आनंदात न्हाऊन निघतं. पण त्या घरातील पहिल्या मुलाच्या मनात मात्र वेगळीच भावना निर्माण होऊ शकते. आई-बाबांच्या प्रेमात वाटेकरी येणार, आपल्याकडे असलेलं लक्ष कमी होणार, अशी भीती त्याला वाटू शकते.

Child Psychology: घरात नवीन बाळ येणार ही बातमी ऐकली की सगळं घर आनंदात न्हाऊन निघतं. पण त्या घरातील पहिल्या मुलाच्या मनात मात्र वेगळीच भावना निर्माण होऊ शकते. आई-बाबांच्या प्रेमात वाटेकरी येणार, आपल्याकडे असलेलं लक्ष कमी होणार, अशी भीती त्याला वाटू शकते. योग्य वेळी त्याच्या भावना समजून घेतल्या नाहीत, तर त्याचा परिणाम वागण्यात दिसू लागतो, असे समुपदेशक सांगतात.
आरोही (नाव बदललेले) ही सहा वर्षांची मुलगी. तिची धाकटी बहीण रुही एक वर्षांची आहे. आरोहीचे आई-वडील समुपदेशनासाठी आले तेव्हा ते दोघेही चिंतेत होते. त्यांच्या मते, आरोही आधी खूप समजूतदार, आनंदी आणि सगळ्यांची लाडकी होती. शाळेत शिक्षकांची आवडती, घरी मदत करणारी, हट्ट न करणारी अशी तिची ओळख होती. पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून तिच्या वागण्यात मोठा बदल दिसू लागला.
छोट्या कारणावरून चिडणे, मोठ्याने रडणे, वस्तू फेकणे, आईच्या मागे सतत लागून राहणे, धाकट्या बहिणीवर ओरडणे, तिच्या हातातून वस्तू हिसकावून घेणे अशा गोष्टी वाढू लागल्या. एकदा तर तिने रागाच्या भरात बहिणीला ढकलून दिलं. “रुही मला अजिबात आवडत नाही,” असंही ती म्हणाली. या सगळ्यामुळे आई-वडील घाबरले होते. “आम्ही दुसरं बाळ होऊ दिलं, ती आमची चूक तर नाही ना?” असा प्रश्न त्यांना पडला होता.

Siblings
सत्रांदरम्यान अधिक माहिती घेतली असता एक महत्त्वाची बाब समोर आली. नवीन बाळ येणार हे त्यांनी आरोहीला आधी सांगितलं होतं, पण त्या वेळी “तू मोठी ताई होणार”, “तुला बाळाची काळजी घ्यावी लागेल”, “ताई म्हणून तुला मदत करावी लागेल” अशा जबाबदाऱ्यांवर जास्त भर दिला गेला होता. तिच्या वयाच्या मानाने ही जबाबदारी मोठी होती. त्यातच बाळाच्या जन्मानंतर आई-वडिलांचा वेळ, लक्ष आणि प्रेम विभागलं गेलं. तिच्यासाठी हा बदल खूप मोठा आणि त्रासदायक होता.
आरोही जरी ताई असली तरी ती स्वतः फक्त सहा वर्षांचीच होती, ही गोष्ट पालक नकळत विसरले होते. तिलाही आई-बाबांचा तितकाच वेळ आणि माया हवी होती. तिच्या मनातील असुरक्षितता, मत्सर आणि भीती यांना शब्द मिळत नव्हते. त्यामुळे ती रागाच्या रूपात बाहेर पडत होती.
समुपदेशनात पालकांना हे सगळं शांतपणे समजावून सांगितलं. आरोहीला वेगळा “स्पेशल टाइम” देणं, तिचं ऐकून घेणं, तिच्या भावना मान्य करणं, धाकट्या बहिणीची जबाबदारी जबरदस्तीने न देणं, तिचं कौतुक करणं अशा काही उपायांची अंमलबजावणी करण्यात आली. “तू अजून लहान आहेस, आम्ही तुझ्यासोबत आहोत,” हा संदेश तिला दिला गेला.
काही आठवड्यांतच बदल दिसू लागले. आरोहीचा राग कमी झाला. ती बहिणीसोबत हळूहळू खेळू लागली. आई-वडिलांनीही तुलना टाळली आणि दोघींना समान प्रेम दिलं. आज दोन्ही बहिणींचं नातं इतकं घट्ट झालं आहे की एकमेकींशिवाय त्यांना करमत नाही, असे आई समाधानाने सांगते.
समुपदेशकांचा सल्ला स्पष्ट आहे. घरात दुसरं बाळ आलं की पहिल्या मुलाच्या भावनांकडे विशेष लक्ष द्या. त्याला जबाबदाऱ्यांपेक्षा आधार आणि समजून घेणं जास्त गरजेचं असतं. प्रेम विभागलं जात नाही, ते वाढतं ही जाणीव मुलाला कृतीतून करून द्या.





