Parenting Tips: घरात एखादं मूल सतत हट्ट करत असेल, आक्रस्ताळेपणा करत असेल किंवा रडून-ओरडून आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत असेल, तर ही बाब हलक्यात घेण्यासारखी नाही. अशा वर्तनाला वेळेत योग्य दिशा दिली नाही, तर पुढे ते हाताळणं अधिक कठीण होऊ शकतं. समजा, मुलाने खूप हट्ट केला आणि आईने त्याला काही वेळ न बोलण्याची शिक्षा दिली. अशा वेळी घरातील इतर सदस्यांनीही आईच्या निर्णयाला पाठिंबा देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मुलाला हे समजलं पाहिजे की त्याचं चुकीचं वर्तन घरातील सर्वांकडून नाकारलं जात आहे. जर आईने शिक्षा दिली आणि वडील किंवा आजी-आजोबा त्याच वेळी त्याच्याशी मोकळेपणाने वागले, तर मुलाच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्याला कळत नाही की नेमकं योग्य काय आणि अयोग्य काय. चुकीच्या वर्तनाकडे काही वेळ दुर्लक्ष करणं उपयुक्त ठरू शकतं. कारण प्रत्येक हट्टाला, रडण्याला किंवा आक्रस्ताळेपणाला त्वरित प्रतिक्रिया दिली, तर “क्रियेला प्रतिक्रिया” या नियमाप्रमाणे मुलाची प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकते. चिडणे, मारणे किंवा शारीरिक शिक्षा देणे यामुळे समस्या वाढू शकते. मात्र दुर्लक्ष करताना ते अति होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कारण कधी कधी दुर्लक्ष केल्यामुळे वर्तन आणखी तीव्र होण्याची शक्यता असते. Parenting Tips for Parents सध्या समुपदेशन करताना असे लक्षात येते की सर्व वयोगटांतील मुलांमध्ये आक्रमक, हट्टी आणि आक्रस्ताळ वर्तन वाढत आहे. यामागे एक मोठं कारण म्हणजे पालक आणि मुलांमधील बदललेले नातेसंबंध. आजच्या धावपळीच्या जीवनात संवाद कमी झाला आहे. मुलांना दिला जाणारा वेळ कमी झाला आहे. अपेक्षा मात्र वाढल्या आहेत. शिस्त लावण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. या सर्वांचा परिणाम मुलांच्या वर्तनावर दिसून येतो. घरातील सदस्यांमध्ये शिस्त लावण्याबाबत एकमत नसणे हेही मोठे कारण आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, असे म्हणतात. जसा आकार द्याल तसे ते घडते. पण जर आकार देताना मतभेद, गोंधळ आणि विसंगती असेल, तर मूलही गोंधळलेले आणि अस्थिर बनते. हेच पुढे समस्या वर्तनाच्या रूपात दिसते. मुलांनी कसं वागावं, कोणत्या सवयी लावाव्यात, शिस्त कशी लावावी, याबाबत पालकांनी आधीच चर्चा करणे गरजेचे आहे. दोघांचेही विचार ऐकून घ्या. एकमेकांचा आदर करा. वाद टाळा. अशा चर्चा मुलांसमोर करू नका. कारण पालकांमधील एकवाक्यता मुलाच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांमध्ये समस्या निर्माण झाल्यावर उपाय शोधण्यापेक्षा, लहानपणापासूनच योग्य सवयी लावण्यावर भर दिला पाहिजे. योग्य संवाद, सातत्यपूर्ण शिस्त आणि एकत्रित प्रयत्न यामुळे मुलांमधील समस्या वर्तन कमी करता येऊ शकते. पालकांनी एकत्र येऊन ठरवलेली ठोस रुपरेषा आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी हेच यशाचं गमक आहे.