छत्रपती शिवाजी महाराज सर्किट: रेल्वेने जोडणार गडकिल्ल्यांचा वारसा!

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘वेव्ह्स समिट 2025’च्या तयारीसाठी पाहणी केली आणि रेल्वे विकासाबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांची माहिती देताना ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या 10 दिवसांच्या आयकॉनिक रेल्वे टूरची घोषणा केली, जी गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांना जोडेल.
रेल्वे विकासाची गती-
फडणवीस म्हणाले, “रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने महाराष्ट्रात मोठी प्रगती होत आहे. गोंदिया-बल्लारशाह मार्गाचे दुहेरीकरण होत असून, यामुळे छत्तीसगड आणि तेलंगाणाशी व्यापार वाढेल.” रेल्वे विभाग 1 लाख 73 हजार कोटींची गुंतवणूक करत असून, 132 रेल्वे स्टेशनांचा पुनर्विकास केला जात आहे. यंदा रेल्वे अर्थसंकल्पात 24 हजार कोटी रुपये मिळाले असून, दरवर्षी 23-25 हजार कोटींची तरतूद मिळत आहे.
आयकॉनिक रेल्वे टूर-
‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही रेल्वे टूर शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना जोडेल. “10 दिवसांच्या या प्रवासात पर्यटकांना महाराष्ट्राचा समृद्ध वारसा अनुभवता येईल,” असे फडणवीस म्हणाले. ही टूर केंद्र सरकारच्या पाठबळाने लवकरच सुरू होणार आहे.
कोकण रेल्वेसाठी प्रयत्न-
कोकण रेल्वेच्या विकासासाठी केंद्राकडे विनंती केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “रेल्वेचे दुहेरीकरण आणि नवीन स्टेशन बांधण्यासाठी कॉर्पोरेशनकडे निधी नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने गुंतवणूक करावी,” अशी मागणी आहे. रेल्वे मंत्रालयाने याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी नमूद केले.
पावसाळ्यातही रेल्वे सुरळीत-
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पावसाळ्यात रेल्वे लाईनवर दीड फूट पाणी असले तरी रेल्वे अखंडित धावेल, अशी नवीन यंत्रणा लवकरच कार्यान्वित होईल.
वेव्ह्स समिटची तयारी –
‘वेव्ह्स समिट 2025’साठी फडणवीस आणि वैष्णव यांनी ऑडिटोरिअम्सची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. या समिटमुळे महाराष्ट्रातील विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.





