Chhagan Bhujbal On Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले. त्यानंतर या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी रायगडावर शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचे अनावर करण्यात आले.
यावेळी शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. तब्बल 40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते. । Chhagan Bhujbal On Sharad Pawar
दरम्यान, यावर आता अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुतारी चिन्हामुळे काही बदल होईल असे वाटत नाही. अनेकांच्या मनात घड्याळ फिट्ट बसले आहे. निवडणूक लोकसभेची आहे त्यात कुणाला पाठवायचा.
कोण सरकार चालवू शकते, त्यांना पाठविले जातं. लोकसभा, महानगर पालिका, विधानसभा कोण चालवू शकते हे लोकांना कळालं. कोणाला कुठे बसवायचे हे लोकांना चांगले कळतं’, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
‘तुतारी जनतेला प्रेरणा देईल’ – शरद पवार
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील.
निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. पुन्हा जनतेचं राज्य येण्यासाठी कष्ट करायला लागेल. ही तुतारी प्रेरणा देणारी आहे. या ऐतिहासिक भूमीतून प्रेरणा घेऊन राज्य उभं करु, जनतेचे राज्य बनवू,” असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.