Champions Trophy 2025 (BCCI VS PCB) : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पण टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्याच्या मूडमध्ये नाही. याबाबत आतापर्यंत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, ते म्हणाले की, “सध्या कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पण वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल. ते पुढे म्हणाले की, जर टीम इंडिया पाकिस्तानला गेली नाही तर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित केली जाऊ शकते.”
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याची शक्यता कमी आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानलाही गेला नव्हता. भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. गेल्या वेळी हायब्रीड मॉडेल अंतर्गत आशिया कप आयोजित करण्यात आला होता.
भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर टी-20 मालिका आयोजित केली जाईल. या मालिकेबाबत जय शहा म्हणाले की, ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची मालिका असेल. बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता या मालिकेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कारण तेथे सरकार स्थापन झाले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून आणि दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. त्याचा पहिला सामना 6 ऑक्टोबर, दुसरा सामना 9 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्याचे ठिकाण बदलले आहे. यापूर्वी हा सामना धर्मशाला येथे होणार होता. मात्र आता त्याचे आयोजन ग्वाल्हेरमध्ये केले जाणार आहे.