बँकॉक – थायलंड आणि कंबोडियाने आपल्यातील संघर्ष मिटवण्यासाठी युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही देशांच्या सीमाभागात गेल्या काही आठवड्यांपासून सशस्त्र हिंसाचार उफाळला होता. सीमेजवळच्या वादग्रस्त भूभागावर दोन्ही देशांकडून दावा केला जातो आहे. या परस्पर विरोधी दाव्यांमधून हा संघर्ष उसळला होता. हा संघर्ष संपवण्यासाठी आज दुपारी युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सध्याचा हिंसाचार थांबवण्याबरोबर भविष्यात कधीही सीमाभागात संघर्ष होऊ नये, कोणत्याही एका देशाने दुसऱ्याविरोधात हिंसक हालचाली करू नयेत, एकमेकांच्या हवाई हद्दीत लष्करी कारवाईच्या निमित्ताने घुसखोरी करू नये, असे देखीलआज झालेल्या युद्धबंदी कराराद्वारे मान्य करण्यात आले. अलिकडे झालेल्या संघर्षादरम्यान केवळ थायलंडने कंबोडियाच्या हद्दीत शिरून हवाई हल्ले केले होते. अगदी अलिकडेच शनिवारी सकाळीच थायलंडने हे हवाई हल्ले केले होते, असे कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. आज करण्यात आलेली युद्धबंदी ७२ तास पुर्णपणे पाळण्यात आल्यानंतर थायलंडच्या ताब्यात असलेले कंबोडियाचे १८ सैनिक परत पाठवून देण्याची अट देखील थायलंडला घालून देण्यात आली आहे. कंबोडियाच्या या सैनिकांना थायलंडने जुलै महिन्यात झालेल्या संघर्षापासून आपल्या तुरुंगात डांबून ठेवले आहे. या सैनिकांची सुटका ही कंबोडियाची महत्वाची अट होती.