CBSE New Rules : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र अनिवार्य करण्यात येणार असून, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान विषयांत दोन स्तरांची परीक्षा पद्धती लागू केली जाणार आहे. नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार भाषांची मांडणी ‘R1, R2 आणि R3’ अशा तीन स्तरांवर करण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना आता तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल, ज्यापैकी किमान दोन भाषा या भारतीय असणे बंधनकारक आहे. बहुभाषिक शिक्षणाला चालना देण्यासाठी सहावीपासून तिसरी भाषा अनिवार्य केली असली, तरी परदेशातून परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष प्रसंगी यातून सवलत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना एकूण विषयांची संख्या कायम राखून इतर विषयांचा अभ्यास करावा लागेल. गणित आणि विज्ञान विषयांच्या बाबतीत मंडळाने दोन स्तर पॅटर्न आणला आहे. २०२६-२७ च्या सत्रापासून नववीतील सर्व विद्यार्थ्यांना स्टँडर्ड (प्रमाणित) अभ्यासक्रम शिकावा लागेल आणि त्याची ८० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांना या विषयांत अधिक रुची आहे किंवा उच्च कौशल्य प्राप्त करायचे आहे, त्यांच्यासाठी ॲडव्हान्स्ड (प्रगत) स्तराचा पर्याय उपलब्ध असेल. हा प्रगत पेपर २५ गुणांचा आणि एक तासाचा असेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उच्च-स्तरीय विचार क्षमतेची चाचणी घेतली जाईल. ॲडव्हान्स्ड पेपरमधील गुण विद्यार्थ्यांच्या एकूण टक्केवारीत किंवा निव्वळ निकालात जोडले जाणार नाहीत. या परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर प्रगत स्तर उत्तीर्ण झाल्याची स्वतंत्र नोंद केली जाईल.