- एक लाख 42 हजार कार्डधारकांना फायदा
पिंपरी – “करोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता एक लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने धान्य देण्याची कार्यवाही 1 मे पासून सुरू होणार आहे. मे आणि जून महिन्यांसाठी त्या-त्या महिन्यात हे धान्य दिले जाणार आहे. शहरातील सुमारे 1 लाख 42 हजार कार्डधारकांना त्याचा फायदा मिळणार आहे.
शहरातील स्वस्त धान्य दुकानांतून सध्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि अंत्योदय अन्न योजनेतील नियमित धान्य वाटप सुरू आहे. नियमित धान्यामध्ये 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो या दराने तांदूळ दिला जात आहे. त्याशिवाय, संबंधित कार्डधारकांनी नियमित धान्य घेतल्यानंतर त्यांना प्रति व्यक्ती मोफत पाच किलो तांदूळही दिला जात आहे.
योजनांमध्ये असणाऱ्या लाभार्थ्यांनाच धान्य मिळत असल्याने गरजू आणि हातावर पोट असलेल्या अन्य नागरिकांचे मात्र सध्या हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने केशरी कार्डधारकांना देखील सवलतीच्या दराने धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही 1 मे पासून सुरू होणार आहे.
केशरी कार्डधारकांना गहू 8 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने दिला जाणार आहे. दरमहा प्रतिमाह प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो धान्य दिले जाईल. एप्रिल व मे महिन्यांसाठीच त्या-त्या महिन्यात संबंधित धान्य मिळेल. संगणकीय प्रणालीत नोंदी न झालेले कार्डधारक अथवा आधार लिंकिंग न झालेल्या कार्डधारकांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शहरात चिंचवड विभागातंर्गत 73 हजार 487 कार्डधारकांना 93 स्वस्त धान्य दुकानांतून तर, पिंपरी विभागातंर्गत 68 हजार 927 कार्डधारकांना 77 स्वस्त धान्य दुकानांतून हे धान्य वाटप करण्यात येणार आहे.
केशरी कार्डधारकांना मे आणि जून अशा दोन महिन्यांसाठी स्वस्त धान्य दुकानांतून सवलतीच्या दराने धान्य दिले जाणार आहे. मे महिन्यातील धान्य मे महिन्यात तर, जूनचे जून महिन्यात मिळेल. 1 मे पासून धान्य वाटपास सुरवात होईल. अन्नधान्य वितरण अधिकारी (पुणे) अंतर्गत त्याचे नियोजन केले आहे.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, निगडी.केशरी कार्डधारकांना मे महिन्यापासून धान्य वाटपास सुरुवात होणार आहे. कार्डधारकांचे प्रमाण मोठे असल्याने स्वस्त धान्य दुकानांमध्ये वेळेत धान्य पोहचणे गरजेचे आहे. तसेच, धान्य वाटप करताना नागरिकांची गर्दी होणार नाही, याची देखील दक्षता घ्यावी लागणार आहे.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशन