Call for a Maharashtra Bandh : आज महाराष्ट्र बंदची हाक! काय सुरू, काय बंद? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Call for a Maharashtra Bandh : या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज (23 जुलै) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.

Call for a Maharashtra Bandh : दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणांविरोधात तसेच नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याने आंदोलनाला वेगळं वळणं मिळालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज (२३ जुलै) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २१ जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. त्यांनी भाजपविरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या बंदमध्ये स्वेच्छेने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर २२ जुलै रोजी राजभवनाबाहेर झालेल्या आंदोलनात युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण राहावा, असे आवाहन करत नागरिकांनी कामावर जाऊ नये, दुकाने बंद ठेवावीत, तसेच ओला-उबर सेवा आणि बस वाहतूकही बंद ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, बंदला प्रतिसाद मिळाल्यास राज्यातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये सुरूच
दरम्यान, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने शाळा किंवा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली नाही. मुंबईसह उपनगरांतील सर्व सरकारी, महानगरपालिका आणि खासगी शाळा तसेच महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये किंवा सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक सेवा नियमितपणे सुरू राहतील.
मुंबईत जमावबंदी लागू
सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार शहरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास निर्बंध आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे.
आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी काय?
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तसेच परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमितता रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी आंदोलनकर्ते करत आहेत. विविध विद्यार्थी संघटनांसह काही राजकीय संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या आंदोलनाला मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील समर्थन दिले आहे.
Kundamala: कुंडमळ्यात पावसाळी पर्यटनासाठी गर्दी! धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन





