कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ नंदीग्राममधील ममतांच्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार त्यांच्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आला.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून तृणमूलने सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता मिळवली. मात्र, ममतांना नंदीग्राम मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. आता मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी ममतांना आमदार बनणे अनिवार्य आहे.
ती संधी त्यांना भवानीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीने मिळवून दिली आहे. नंदीग्राममध्ये ममतांचा पराभव करण्यासाठी कारस्थान झाल्याचा आरोप तृणमूलकडून सातत्याने केला जात आहे. आता भवानीपूर मतदारसंघातून ममतांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे लक्ष्य त्या पक्षाने समोर ठेवले आहे.
भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी 30 सप्टेंबरला मतदान होईल. ममतांविरोधात भाजपने प्रियांका टिबरेवाल यांना तर डाव्या आघाडीने श्रीजिब बिस्वास यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसने ममतांविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.