Rajabhau Waje : अॅापरेशन टायगरची चर्चा; ठाकरेंचा खासदार दिल्लीला रवाना, स्वतः दिली माहिती म्हणाले “मी आता…”
Rajabhau Waje : गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातील खासदारांना आपल्या गटात आणण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा होत्या.

Rajabhau Waje : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पक्षांतर्गत हालचालींनाही वेग आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार आज नवी दिल्लीत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ठाकरे गटातील नेमके किती खासदार या बैठकीला उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातील खासदारांना आपल्या गटात आणण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा होत्या. पण काही खासदारांच्या नकारामुळे या हालचालींना अडथळा आला होता. मात्र आता पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या सर्व चर्चांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या बाईटमध्ये ते म्हणाले की ते राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाले असून दुपारी 3 वाजता होणाऱ्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी ते दिल्लीत पोहोचत आहेत.
‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारले असता वाजे यांनी कोणतीही संदिग्धता न ठेवता आपली भूमिका स्पष्ट केली. “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो, त्या पक्षाशी फारकत घेण्याचा प्रश्नच नाही,” असे ते म्हणाले.
राजाभाऊ वाजे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांवर काही प्रमाणात पडदा पडला असला, तरी दिल्लीतील राजकीय घडामोडींवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
खासदारांच्या संभाव्य फुटीचे कारण समोर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या संभाव्य खासदारांच्या फुटीचे कारण समोर आले आहे. आपण तळागाळात पोहचून स्थानिक पातळीवर राजकीय आव्हानांना तोंड देत असूनही, वारंवार विनंती केल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी आपल्या मतदारसंघांना भेट दिली नाही, याविषयी खासदारांच्या मनात नाराजी आहे. या नाराजीचा उद्रेक फुटीतून होणार असल्याची चर्चा आहे.
खासदारांनी स्थानिक निवडणुकांसाठी निधी आणि संघटनात्मक पाठिंब्याची वारंवार विनंती केली, परंतु त्यांच्या मागण्यांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांना वाटत असल्याचे सांगितले जात आहे. 2022 मध्ये 40 आमदार सोडून गेले तेव्हा सुद्धा पक्षप्रमुख भेट देत नसल्याची त्यांची तक्रार होती. आता हीच खासदारांचीही तक्रार आहे.






