Budget 2025 : गोष्ट भारताच्या अर्थसंकल्पाची: ब्रीफकेस टू पेपरलेस… कसा आणि का बदलत गेला देशाच्या अर्थसंकल्पाचा फॉर्मेट?

Budget 2025 – प्रत्येक देशातील सरकार दरवर्षी आपला अर्थसंकल्प सादर करत असते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करतील.
अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा विक्रमी आठवा अर्थसंकल्प असेल. यावेळीही अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. मध्यमवर्गीयांवरील करांचे ओझे कमी झाले पाहिजे आणि दैनंदिन जीवनातील वस्तूंचे दर देखील कुठंतरी कमी व्हायला हवे अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. तसेच देशात रोजगारनिर्मितीचा वेगही मंदावला असून केंद्रसरकाने याकडे लक्ष देऊन चांगली योजना सुरु करणं गरजेचं आहे.
या सर्व गोष्टी महत्वाच्या असताना दुसरीकडे मात्र मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्पात काही बदल झाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये विशेष करून ‘आत्मनिर्भर भारत संकल्पना’, ब्रिफकेसची परंपरा खंडित करून लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात, ‘पेपरलेस पद्धत बंद करून ऑनलाइन उपलब्ध’ सुरु केली. आणि शेकडो पेपर्सची जागा एका टॅबलेटने घेतली.
चामड्याच्या ब्रीफकेची परंपरा :
पूर्वी चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे ठेवण्याची परंपरा होती. बजेट हा शब्द फ्रेंच शब्द ‘बुजे’ पासून आला आहे. बुजे म्हणजे चामड्याची पिशवी. भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पापासून बजेटची कागदपत्रे चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये ठेवण्याची परंपरा आहे. 1947 च्या पहिल्या बजेटसाठी लाल रंगाच्या चामड्याचे ब्रीफकेस वापरण्यात आले होते.
नंतर काही मंत्र्यांनी काळ्या ब्रीफकेसमध्ये तर काहींनी इतर डिझाइनच्या बॅगमध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे ठेवली. मात्र, त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली होती. आणि नंतर देखील बंद झाले.
ब्रिफकेसची परंपरा केली खंडित :
ब्रिटिश काळापासून या ब्रिफकेसची परंपरा चालत आली होती. मात्र, 2020 पासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली. लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आणलेला अर्थसंकल्प बघून निर्मला सीतारामन यांना अनेक प्रश्नोत्तरांचा सामना करावा लागला होता.
‘ब्रीफकेस किंवा सुटकेस ही इंग्रजांची देणं असून, मला ब्रीफकेस पसंत नसल्याचे सीतारामन यांनी यावेळी सांगितले होते. या लाल चोपडीवर सोनेरी रंगाचे अशोक चिन्ह बनवले होते. विशेष म्हणजे हे कापड निर्मला यांना त्यांच्या मामीनं गिफ्ट केले होते.
अर्थसंकल्प पहिल्यांदाच झाला पेपरलेस :
चामड्याची ब्रीफकेस आणि लाल रंगाच्या चोपडी नंतर 2021ला निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे सादर केला होता. ‘Budget 2021’ची सॉफ्ट कॉपी, ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं होत. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेची सुरुवात अर्थमंत्रालयाने या निर्णयातून दाखवून देण्यासाठी अर्थसंकल्प मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे सादर केला होता.
अशा प्रकारे बदलत गेला अर्थसंकल्प सादर करण्याच्या फॉर्मेट :
2014: ब्लैक ब्रीफकेस
2015: ऑरेंज ब्रीफकेस
2016: रेड ब्रीफकेस
2017: ब्राउन ब्रीफकेस
2018: मरून ब्रीफकेस
2019: रेड ब्रीफकेस/ वहीखाता
2020: वहीखाता
2021: देशी टैब (मेड-इन-इंडिया टॅबलेट)
पंतप्रधान देशाचा अर्थसंकल्प सादर करायचे :
एक काळ असा होता जेव्हा अर्थमंत्र्यांऐवजी पंतप्रधान देशाचा अर्थसंकल्प सादर करत असत. हे काम देशातील तीन पंतप्रधानांनी केले आहे. यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1958 मध्ये स्वतः पंतप्रधान असताना देशाचा अर्थसंकल्प सादर केला.
जवाहरलाल नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून देशाचा अर्थसंकल्प सादर केला. इंदिरा गांधींनंतर या यादीत तिसरे नाव राजीव गांधी यांचे आहे. त्यावेळीही राजीव गांधींना अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि त्यांनी 1987-88 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प :
– ‘स्वतंत्र’ भारताचा अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात असून, तत्कालीन अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी अर्थ संकल्प सादर केला होता. तर पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीचे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ‘जेम्स विल्सन’ यांनी सादर केला.
कोणाचे भाषण सर्वाधिक मोठे होते :
– 2020-21ला निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे सादर केला होता. यावेळी सीतारामन यांनी दोन तास 42 मिनिटांचे भाषण दिले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या आपले भाषण पूर्ण करू शकल्या नाहीत आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवटचे दोन परिच्छेद वाचून ते पूर्ण केले.
– डॉ. मनमोहन सिंह यांनी 1991 रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक शब्द होते. या भाषणात तब्बल 18 हजार 650 शब्द होते.
सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण :
अर्थमंत्री हिरुभाई पटेल यांनी 1977-78 मध्ये फक्त 800 शब्दांचे सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण दिले. हे भाषण अंतरिम अर्थसंकल्पाचा भाग म्हणून देण्यात आले होते.
अर्थसंकल्पासाठी फेब्रुवारीची पहिली तारीखच का?
सध्या अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जातो. मात्र, काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी स्थिती नव्हती. यापूर्वीही अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केला जात होता, परंतु महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 28 किंवा 29 तारखेला सादर केला जात होता.
मात्र, 2017 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून अर्थसंकल्पाची तारीख एकच आहे.





