चुकून सीमा ओलांडली…, भारताच्या BSF जवानाला पाक रेंजर्सने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : पंजाबमधील फिरोजपूर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवारी दुपारी सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान चुकून सीमा ओलांडल्याने पाकिस्तान रेंजर्सने त्याला ताब्यात घेतले. हा जवान स्थानिक शेतकऱ्यांना कुंपणाजवळ सुरक्षा पुरवत असताना हा प्रकार घडला, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली.
प्राथमिक अहवालानुसार, जवानाने अनावधानाने पाकिस्तानी हद्दीत पाऊल ठेवले. या घटनेनंतर बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात फ्लॅग मीटिंग सुरू झाली असून, जवानाच्या सुरक्षित आणि लवकर परतण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. “दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी संवाद साधत आहेत,” असे अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले.
बीएसएफ हे 3,323 किमी लांबीच्या भारत-पाकिस्तान सीमेचे मुख्य संरक्षक आहे, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीर (एलओसीचा भाग), पंजाब, राजस्थान आणि गुजरात यांचा समावेश आहे. ऐतिहासिक तणाव आणि सततच्या सुरक्षा आव्हानांमुळे ही सीमा देशातील सर्वात संवेदनशील आणि अस्थिर मानली जाते. सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण असताना ही घटना घडली आहे.





