पुणे – नवले पुलावर आजपर्यंतचा सर्वात भीषण अपघात झाला आहे. रविवारी (दि. 20) रात्री पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने 48 वाहनांना उडविले. त्यामध्ये अनेक चारचाकी वाहनांचा चेंदामेंदा झाला. अपघाताचे गांभीर्य पाहून स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जखमींना जवळपासच्या रुग्णालयात हलविले. वाहनांची संख्या लक्षात घेता जखमींची संख्या 50च्या आसपास असण्याची शक्यता पोलीस आणि अग्निशमनदलाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. कालच (शनिवारी) नवले पुलावर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता.
आंध्र प्रदेश येथील एक ट्रक मुंबईच्या दिशेने चालला होता. नऱ्हे येथे नवले पुलाजवळ चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर हा ट्रक समोर दिसेल, त्या वाहनांना धडक देत पुढे गेला. मागून येणारी वाहनेही एकमेकांना धडकत होती. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहने अस्ताव्यस्त अवस्थेत होती. रस्त्यावर वाहनांच्या काचांचा खच पडला होता. अपघाताची तीव्रता स्थानिक नागरिकांना कळाल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा पोहोचण्याअगोदर नागरिकांनी जखमींना जवळपासच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातामुळे रस्त्यावर मोठी कोंडी झाली.
एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत जखमींची नावे कळली नाहीत. कोणी मृत झाले आहे का, याची माहिती मिळाली नाही. दरम्यान, “पीएमआरडीए’च्या अग्निशमन दलाचे अधिकारी सुजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावणेनऊच्या सुमारास अपघात झाला. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालो. 48 अपघातग्रस्त वाहने मिळाली. कार, जीप, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा वाहनांचा अपघात झाला आहे. पोहोचण्याआधीच नागरिकांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवले.
वाहनांची संख्या पाहता किमान 50 व्यक्ती जखमी असतील, असा आमचा अंदाज आहे. सध्या आम्ही अपघातामुळे रस्त्यावर सांडलेले ऑईल, धुवून आणि त्यामध्ये माती टाकून बाजूला काढत आहोत. जेणे करून रस्ता मोकळा होऊन वाहतूक सुरळीत होईल. यास आम्ही प्राधान्य देत आहोत. दरम्यान, काही लोक प्राथमिक उपचार घेऊन निघाल्याची माहिती मिळाली आहे. ट्रकचालक फरार झाला आहे.