“सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा बलाने दशहत माजवलीय”; ममता बॅनर्जींकडून सरकार, सुरक्षा यंत्रणांवर गंभीर आरोप

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला हरवण्याच्या त्यांच्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. मात्र ते करत असताना त्यांच्या एका विधानावरून सध्या देशभरात गदारोळ माजला आहे. यावेळी त्यांनी देशाच्या सुरक्षा यंत्रणावरच गंभीर आरोप केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना, ‘देशातली अराजकता कमी करण्यासाठी लोकांचं सरकार आणण्याचा प्रयत्न करायला हवा’ असे म्हटले. तसेच बंगालमधील हिंसाचार आणि भ्रष्टाचारावरून भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिले. यतसेच बंगालमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. परंतु राज्याच्या सीमावर्ती भागात बीएसएफने म्हणजेच सीमा सुरक्षा बलाने दशहत माजवली आहे. सीमावर्ती भागात निर्दोष लोक मारले जात आहेत. परंतु या हत्यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने साधी चौकशी समिती नेमण्याचीदेखील तसदी घेतली नाही.
पुढे त्यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी गायीला मिठी मारण्याचा प्रस्ताव केंद्राने मागे घेतला आहे. यावरून भाजपाला लक्ष्य करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर एखादी व्यक्ती गायीला मिठी मारायला गेली आणि गायीने त्या व्यक्तीला टक्कर मारली किंवा लाथ मारली तर काय होईल. भाजपा सरकार लोकांना भरपाई देईल का?
तसेच ममता बॅनर्जी यांनी, भाजपा सरकार इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की, त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या अमर्त्य सेन यांचा पण अपमान केला. दरम्यान, सोमवारी बंगालच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना विधानसभेचे अध्यक्ष बिमान बोस यांनी त्यांचे भाषण पूर्ण करण्यापासून रोखल्या त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर काही वेळाने सभागृहाचे कामकाज सुरू झाले पण यावेळी त्यांनी राज्यपालांवर टीका केली.





