Border-Gavaskar Trophy 2024 : गोलंदाजांचे योग्य नियोजन केल्यास मालिका जिंकण्यास भारत सक्षम – शेन वॉटसन

Border-Gavaskar Trophy 2024/25 :- आगामी बॉर्डर -गावस्कर चषक स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या वेगवान गोलंदाजांचे योग्य नियोजन करून त्याचा वापर केल्यास भारतीय संघ मालिका जिंकण्यासाठी सक्षम असल्याचे मत ऑस्ट्रेलिया संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने व्यक्त केले आहे. गेल्या दोन दौऱ्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच भूमीमध्ये पराभूत करण्याचा विक्रम केला होता. भारताच्या आगामी दौऱ्याची सुरुवात २२ नोव्हेंबर पासून पर्थ येथील कसोटी सामन्यातून होणार आहे.
इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या उदघाटनावेळी वॉटसन म्हणाला, भारताच्या वेगवान गोलंदाजानाकडे मालिका जिकंण्याची क्षमता आहे. त्यांची गोलंदाजी देखील दमदार आहे. मात्र भारताला गोलंदाजांना योग्य प्रकारे फिरवून वापरावे लागणार आहे. रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गोलंदाजी करताना बळी घेण्याची क्षमता असल्याचे वॅटसन बोलताना म्हणाला.
जैस्वालचं केलं कौतूक….
चेतेश्वर पुजाराने 2018-19 व 2020-21 मध्ये भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, यावेळी पुजाराला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याचा अनुपस्थितीचा भारतीय संघावर काहीच परिणाम होणार नाही, असे मत वॉटसनने बोलताना सांगितले. तो म्हणाला की, पुजाराने दोन्ही वेळेस दमदार फलंदाजी केली होती. मात्र, सध्याच्या घडीला भारताकडे अनेक अविश्वसनीय फलंदाज आहेत. यामध्ये यशस्वी जैस्वाल सारखा फलंदाज देखील कोणतीही चूक न करता झटपट धावा बनवू शकतो.
यामुळे कसोटी सामना वेगवान होतो….
जैस्वाल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाना बाद करण्याची संधीच देत नाही. जैस्वाल सारखे फलंदाज मालिकेत आक्रमक फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना दबावाखाली आणू शकतात. अशा खेळाडूंमुळे कसोटी सामना देखील अधिक वेगवान होतो, असे वॉटसन बोलताना म्हणाला. भारताच्या फलंदाजांची क्षमता आणि कौशल्ये यांच्या जोरावर ते गोलंदाजांवर दबाव आणण्यात यशस्वी होतील, असे मत वॉटसनने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाला घराच्या मैदानावर आव्हान…
भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आपली सर्वोत्तम कामगिरी द्यावी लागेल, असे वॉटसन म्हणाला. तो म्हणाला, “भारताकडे निश्चितच दडपण निर्माण करण्याची क्षमता आहे. हा संघ ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर मोठे आव्हान देऊ शकतो. गेल्या वेळी जेव्हा ते ऑस्ट्रेलियात भेटले तेव्हा भारत खूप चांगला खेळला. गेल्या दौऱ्यातून त्यांना आत्मविश्वास मिळेल.





