BMC निवडणूक: 227 जागांच्या महापालिकेत शिंदेंची सेना ‘इतक्या’ जागांसाठी आग्रही; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

Eknath Shinde : राज्यात आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या संभाव्य तारखांबाबत माहिती समोर आली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. सर्वेाच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचे बंधनकारक केले आहे.
त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. अॅाक्टोबर महिना संपून आता नोव्हेंबर महिना सुरू होईल. त्यामुळे या निवडणुकींसाठी तीन महिने म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे अत्यंत महत्वाचे असणार आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक. मुंबई महापालिकेसाठी महायुतीने एकत्रित म्हणजेच महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ही निवडणूक महायुतीतील घटक पक्षांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार व सुरू असलेल्या चर्चेनुसार मुंबई महापालिकेसाठी महायुतीने एकत्र लढण्याचा निर्धार केला असला तरी जागावाटपावर धुसफुस होऊ शकते, अशी माहिती आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर जागावाटप करताना पेच निर्माण होऊ शकतो. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना १०० ते ११० जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा : तयारीला लागा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; ‘या’ दिवशी आचारसंहिता लागणार?
२०१७ मध्ये मुंबई महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ हे ८४ इतके होते. मुंबई महापालिकेत २२७ सदस्यांची संख्या आहे. २०१७ च्या एकूण ८४ जागांपैकी ५० ते ६० नगरसेवक हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.
…त्यामुळे जागा परत मिळवण्यासाठी शिंदे आग्रही
त्यामुळे सर्व जागा आम्हाला मिळाव्यात ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे. तर इतर उरलेल्या जागांमध्ये समसमान वाटप व्हावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. विधानसभेला मुंबईतही एकनाथ शिंदे यांनी काही जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जिंकलेल्या जागा परत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असल्याची माहिती आहे.
पश्चिम उपनगरात भाजपचा जोर
दुसरीकडे राज-उद्धव यांची राजकीय युतीची चर्चा सुरू आहे. अद्यापर्यंत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी स्थानिक पातळीवर जागांसंर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधूंसाठी आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात भाजपचा जोर आहे. त्यामुळे भाजपकडून या निवडणुकीसाठी जोर लावला जाणार आहे.
हेही वाचा : माघार नाहीच! बच्चू कडूंनी सरकारला दिला अल्टिमेटम; प्रमुख मागण्या कोणत्या?





