BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असताना, आज ११ जानेवारी २०२६ रोजी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या युतीची ऐतिहासिक संयुक्त सभा पार पडली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे तब्बल २० वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले. या सभेला हजारोंचा जनसागर उपस्थित होता, ज्यामुळे मुंबईत राजकीय वातावरण अधिक तापले आहे. मतदान १५ जानेवारी रोजी होणार असून, ही सभा युतीच्या ताकदीचे प्रदर्शन मानली जात आहे. राज ठाकरेंचे जोरदार भाषण आणि सत्ताधाऱ्यांवर टीका सभा मुख्यत राज ठाकरे यांच्या भावुक आणि आक्रमक भाषणाने गाजली. त्यांनी सत्ताधारी महायुती (भाजप-शिवसेना शिंदे गट) वर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणाले, “आज मुंबईवर संकट आलं आहे. मतं विकत घेतली जात आहेत. मुंबईला लुटण्याचे आणि तोडण्याचे डाव सुरू आहेत. त्यामुळेच आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत. मुंबईसाठी हा लढा आहे.” भावुक आठवणी राज ठाकरे यांनी भावूक होऊन आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, “या व्यासपीठावर मी लहान असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेकदा आलो होतो. शिवसेनेची स्थापना इथेच झाली. तेव्हा माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील श्रीकांत ठाकरे आणि माँ उपस्थित होते. आज या क्षणाला हे सर्व इथे हजर असायला हवे होते. ते वरून पाहत असतील आणि आमचा हा लढा पाहत असतील.” युतीतील नाराजी आणि दिलगीरी राज ठाकरे यांनी युतीच्या प्रक्रियेबाबतही खुलेपणाने बोलले. ते म्हणाले, “२० वर्षांनंतर मी पहिल्यांदा युती करतोय. तिकीट वाटपात अनेकांना संधी मिळाली, अनेकांना नाही. काहीजण नाराज झाले, काहींनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केला. आमच्या हातात काही गोष्टी नव्हत्या. ज्यांचे मन दुखावले, त्यांची मी दिलगीरी व्यक्त करतो. सगळे आपलेच आहेत. गेलेले परत येतील. जे आता आहेत, ते कुठे जातील माहीत नाही. आम्ही सर्वांसाठी लढतोय.” सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे आभार त्यांनी मराठी अस्मितेसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. “अनेक लोकांनी आवाज उठवला, त्यांचे मी आभार मानतो. दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार,” असे ते म्हणाले. “बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलो. जाताना पोट भरून जा,” असा भावनिक संदेशही दिला.