BMC Election congress politics : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौरपदाबाबतची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजप-शिवसेना युतीने ठाकरे बंधूंना मोठा धक्का देत मुंबईवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकावला आहे. ठाकरे गटाने मिळालेल्या जागांवर समाधान व्यक्त करत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले असले, तरी चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेसमध्ये मात्र निकालानंतर लगेचच अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसला यावेळी २४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. महायुती आणि ठाकरे गटाच्या लाटेत काँग्रेस टिकेल की नाही, अशीच शंका अनेक नेत्यांना होती. मात्र, काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत २४ जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तरीही या निकालावरून पक्षातील नाराजी काही तासांतच चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी थेट मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अपेक्षित यश न मिळण्यास पक्षाचे नेतृत्वच जबाबदार असल्याचा आरोप करत जगताप यांनी गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. प्रभावी रणनीतीचा अभाव आणि कमकुवत संघटन रचनेमुळे मुंबईत काँग्रेसची ताकद घटल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आहेत. या निकालांचे विश्लेषण केले तर नेतृत्वातील त्रुटी स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे,” असे थेट विधान भाई जगताप यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असल्याने त्यांच्या विधानाला विशेष महत्त्व दिले जात आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची स्थिती कमजोर मानली जात होती. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याने पक्षाला उभारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निकालानंतर व्यक्त होत असलेली नाराजी पाहता ती अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या घडामोडींमुळे मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणार का, वर्षा गायकवाड राजीनामा देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.