Sensex Crash: भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ९६१.४२ अंकांनी म्हणजेच १.१७ टक्क्यांनी घसरून ८१,२८७.१९ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी निर्देशांकही ३१७.९० अंकांनी म्हणजे १.२५ टक्क्यांनी खाली येत २५,१७८.६५ वर स्थिरावला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ४.९८ लाख कोटी रुपये एकाच दिवसात बुडाले. जागतिक बाजारांतील नकारात्मक संकेत, भू-राजकीय तणाव आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे बाजारावर दिवसभर दबाव राहिला. संपूर्ण आठवड्याचा विचार केला तर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे दीड टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. बीएसई बाजार भांडवल घटले – बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) गुरुवारच्या ४६८.४९ लाख कोटी रुपयांवरून घटून शुक्रवारी ४६३.५१ लाख कोटी रुपयांवर आले. हेही वाचा – मुंबईत वर्षभरात केवळ 39 लाचखोरीची प्रकरणे; तज्ज्ञ म्हणतात- ‘कमी गुन्हे म्हणजे कमी भ्रष्टाचार नव्हे’ कोणते समभाग वधारले, कोणते घसरले? sensex आयटी आणि मीडिया वगळता ऑटो, बँकिंग, एफएमसीजी, धातू, रिअल्टी आणि दूरसंचार या सर्व क्षेत्रांमध्ये एक ते दोन टक्क्यांची घट नोंदली गेली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही एक टक्क्यापर्यंत घसरले. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ पाच समभाग हिरव्या क्षेत्रात बंद झाले. एचसीएल टेकने १.२२ टक्के वाढीसह आघाडी घेतली, तर ट्रेंट, इन्फोसिस, इटर्नल आणि एनटीपीसीही वधारले. दुसरीकडे सन फार्मा २.६१ टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक तोट्यात राहिला. भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व आणि इंडिगोमध्येही अडीच टक्क्यांपर्यंत घट झाली. बीएसईवर एकूण ४,३६९ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,६६६ वधारले, २,५२१ घसरले तर १८२ सपाट बंद झाले. १०० समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ३४० समभागांनी नवा नीचांक नोंदवला. हेही वाचा -केजरीवाल, सिसोदिया यांची CBI प्रकरणातून निर्दोष मुक्तता; आता ED प्रकरणाचे काय होणार? शेअर बाजार कोसळण्यामागे ‘हे’ पाच प्रमुख कारणे १. जागतिक बाजारांतून नकारात्मक संकेत – जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि शांघायचा एसएसई कंपोझिट हे आशियाई निर्देशांक सकाळपासूनच घसरणीत होते. अमेरिकेतील एस अँड पी ५०० आणि युरोपीय बाजारही लाल निशानावर बंद झाले. जगातील आघाडीची सेमीकंडक्टर कंपनी एनव्हिडियाचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले असूनही तिचे समभाग ५.५ टक्क्यांनी घसरले, त्याचा फटका जागतिक बाजाराच्या मनोधैर्याला बसला. २. परदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने विक्री – परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी सुमारे ३,४६६ कोटी रुपयांचे समभाग विकले. बुधवारीही त्यांनी विक्री केली होती. या सातत्यपूर्ण विक्रीमुळे बाजारातून मोठ्या प्रमाणावर भांडवल बाहेर गेले आणि गुंतवणूकदारांचा उत्साह मावळला. ३. ‘इंडिया व्हीआयएक्स’ वाढला — अस्थिरतेचा इशारा बाजारातील भीती आणि अनिश्चितता मोजणारा ‘इंडिया व्होलेटिलिटी इंडेक्स’ (इंडिया व्हीआयएक्स) शुक्रवारी सुमारे तीन टक्क्यांनी वाढून १३.४४ वर पोहोचला. एसबीआय सिक्युरिटीजचे तांत्रिक संशोधन प्रमुख सुदीप शाह यांनी सांगितले की बाजारात सावध वातावरण असून मंदीचा दबाव कायम आहे. एकाच पातळीवर रेंगाळणारा बाजार ‘कंसोलिडेशन फेज’मध्ये असल्याचे ते म्हणाले. ४. अमेरिका-इराण तणावाची धास्ती अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकार्यक्रमावरील चर्चा कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपुष्टात आली. त्यामुळे मध्यपूर्वेत संघर्ष भडकण्याची भीती निर्माण झाली. एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉन्मुदी आर यांनी सांगितले की अमेरिकेच्या पुढील कारवाईबाबत वाढती अनिश्चितता आणि बाजारात नव्या सकारात्मक घटकाचा अभाव यामुळे गुंतवणूकदार सतर्क राहिले. ५. रुपयाची घसरण भारतीय रुपया शुक्रवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ४ पैशांनी घसरून ९०.९५ वर आला. परदेशी गुंतवणूकदारांची भांडवल माघार आणि देशांतर्गत बाजाराची कमजोरी ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मात्र डॉलरमधील नरमाई आणि कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने रुपयाची घसरण मर्यादित राहिली.