नवी दिल्ली: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध विषयांवर दोघांची जवळपास दीड तास चर्चा चालली. या भेटीत राज्यातील करोनाची स्थिती आणि राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची महिती सूत्रांनी दिली. पण आता भाजपने “मिशन महाराष्ट्र’ हाती घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही दिल्लीत पोहोचले आहेत. या दोन दिवसीय दौ-यात फडणवीसांनी आज अमित शहांची भेट घेतली. ते उद्या (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्यात करोनाचा उद्रेक असताना फडणवीसांनी दोन दिवसांचा दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गेल्यामुळे भाजपला ते खूप जिव्हारी लागले आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा परत येण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.
ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या दोन नेत्यांच्या बंडानंतर कॉंग्रेसला हादरे बसले आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अनेक असंतुष्ट नेते आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची बांधणी सुरू असतानाच अजित पवारांनी भाजपशी दोस्ती करत सत्ता स्थापन केली. परंतु नंतर ते बंड शांत झाले.
पुन्हा अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रयत्नशील आहेत. मात्र सत्तेतल्या तिनही पक्षामध्ये सर्वच काही आलबेल नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे करोनासारख्या महामारीशी लढत असतानाच ठाकरे सरकारला राजकीय पातळीवही तेवढेच दक्ष राहावे लागणार आहे.