नवी दिल्ली – राज्यात भाजपचे सरकार आल्यास अशोक गेहलोत सरकारने दिलेल्या सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्या जातील. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करावे. कॉंग्रेस सरकारने पाच वर्षांत सामान्य नागरिकांना दिलासा देणारे राज्य केले. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे तुमच्या हिताचे आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा यांनी केले. राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील निवाई येथील झिलई येथून पहिल्या निवडणुकीच्या प्रचारसभेला त्यांनी सुरुवात केली.
प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही निवडक उद्योगपतींना दिलासा दिल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, जेव्हा पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांना त्या देशातील निवडक उद्योगपतींकडून काम मिळते. मोदीजी स्वतःला भूमीपुत्र म्हणवतात आणि आज ते करोडोंच्या ताफ्यात फिरत आहेत. सत्तेत येताच लोक विसरतात की त्यांना सत्तेत कोणी आणले? सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी राजस्थान सरकार मदत शिबिरांचे आयोजन करत आहे. महिलांनाही मोबाईल मिळत आहेत. सरकार जे काही देत त्यावर त्यांचा हक्कच आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, आज महागाई शिखरावर आहे. गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपये असताना गरीब माणूस गॅस कसा विकत घेणार? केंद्र सरकारला विचारा की, एवढी महागाई का आहे? आज मला एक मुलगी भेटली जिच्या हातात मोबाईल होता. ती म्हणाली की, गेहलोत सरकारने मला हा मोबाईल दिला आहे. म्हणूनच सर्वसामान्यांच्या हिताचे सरकार निवडताना काळजीपूर्वक मतदान करा.
गेहलोत म्हणतात सरकारची पुनरावृत्ती होईल
राजस्थान सरकारने प्रत्येक क्षेत्रात निर्णय घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अर्थसंकल्पात केलेल्या सर्व घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यावेळी याच सरकारची पुनरावृत्ती होईल असेच वातावरण निर्माण झाले आहे. यूपीए सरकारने केलेल्या कायद्यांच्या धर्तीवर आम्ही नागरिकांच्या हक्कांवर आधारित युग सुरू केले आहे असं मत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावेळी स्पष्ट केलं.