फडणवीसच CM हवेत’ म्हणणाऱ्या ‘या’ माजी आमदाराचे भाजपकडून 6 वर्षांसाठी निलंबन

रामटेक : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन रेड्डी यांचे पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.
का करण्यात आली कारवाई?
शिवसेनेचे एकनाथ शिंदे नव्हेत तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हवेत, असं वक्तव्य मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केलं होतं. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याकडून आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीलादेखील विरोध करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काय लिहिले पत्रात ?
“आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी असताना पक्ष विरोधी कारवाया करत पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केलं आहे. आपली ही कृती पार्टीचा अनुशासन भंग करणारी असून आपल्याला 6 वर्षांकरता पक्षातून निलंबित करण्यात येत आहे”, असं पत्र मल्लिकार्जुन रेड्डी यांना पाठवण्यात आलं आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून मल्लिकार्जुन रेड्डी यांना निलंबनाचं पत्र पाठवण्यात आलं आहे.





