नवी दिल्ली (प्रतिनिधी) – दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी भाजपने आपची झोप उडविली आहे. बहुमताचा आकडा नसताना भाजपने महापौर आणि उपमहापौरच्या निवडणुकीत उमेदवार उतरविले आहेत. यामुळे “आप’ची चिंता वाढली आहे. भाजपने चंदिगडमध्ये सुध्दा अल्पमतात असताना महापौर निवडून आणण्यात यश मिळविले होते, हे येथे उल्लेखनीय.
Pune : सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना- मंत्री चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपने दिल्लीतील महापालिकेवर आपला झेंडा फडकविला आहे. आता शुक्रवारी, दि. 6 जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होणे आहे. पूर्ण बहुमत मिळाले असल्याने महापौर आणि उपमहापौर आपचाच होण्याची शक्यता आहे.
परंतु, भाजपने महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरविल्याने आपच्या भुवया उंचावल्या आहेत. बहुमताचा आकडा नसतानाही भाजपने आपले उमेदवार मैदानात उतरविल्यामुळे आपचे नगरसेवक फुटणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपचे नगरसेवक फोडल्याशिवाय भाजपला ही निवडणूक जिंकणे शक्य नाही. अशात, भाजपची आपच्या कोणत्या नगरसेवकांवर वक्रदृष्टी पडली आहे? हा खरा प्रश्न आहे. भाजप नेत्यांनी या मुद्यावर घट्ट मौन बाळगले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आप नगरसेवकांची पार्श्वभूमी आणि त्यांची पक्षावरील निष्ठेचा अभ्यास करून महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपची नजर आपच्या त्या नगरसेवकांवर आहे जे अन्य पक्षातून आपमध्ये आले आहेत. शिवाय, आपचे नाराज नगरसेवकही भाजपच्या रडारवर आहे.
दुसऱ्या पक्षातून आपमध्ये आलेल्या नगरसेवकांना सहजरित्या फोडले जावू शकते. ज्यांनी एकदा पक्ष बदलला त्यांच्यासाठी दुसऱ्यांदा पक्ष बदलने फार मोठी गोष्ट नाही, असे भाजपला वाटते. याशिवाय, जे अनेक वर्षांपासून आपमध्ये आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आश्वासनानंतरही पद मिळालेले नाही आणि निवडणुकीपूर्वी ज्यांचा आपशी काहीही संबंध नव्हता, अशा सर्व नगरसेवकांवर भाजपची दृष्टी असल्याचे बोलले जात आहे.