नवी दिल्ली – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या संबंधात केलेल्या टिप्पणीबद्दल देशातील सहा ख्यातनाम पत्रकारांवर भाजप सरकारांनी थेट देशद्रोहाचेच गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा एडिटर गिल्ड या संपादकांच्या संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या पत्रकारांमध्ये मृणाल पांडे, राजदीप सरदेसाई, विनोद जोस, जफर अगा, परेश नाथ आणि अनंत नाथ यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये या पत्रकारांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्यावेळी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. हा शेतकरी पोलीस गोळीबारात मरण पावल्याचे ट्विट या पत्रकारांनी केले होते. ते वस्तुस्थितीला धरून नव्हते आणि त्यात दंगल माजवण्याचाच इरादा होता, असा दावा सरकारने केला आहे.
परंतु जशा घटना घडतात आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्या अनुषंगाने मतप्रदर्शन करणे यात पत्रकारांचा काही दुष्ट हेतू असतो किंवा तो देशद्रोहीच असतो असे मानता येत नाही. काही वेळा माहितीत जी तफावत असते ती काही काळानंतर दुरूस्त केली जाऊ शकते; परंतु तेवढ्यावरून या पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप एडिटल गिल्ड करून करण्यात आला आहे. मुक्त पत्रकारितेचा आवाज दाबण्याचाच हा प्रकार आहे, असेही एडिटर गिल्डने म्हटले आहे.