Bird Flu : देशात पुन्हा बर्ड फ्लूची एन्ट्री; केंद्र सरकारकडून सतर्कतेचा इशारा
Bird Flu : चेन्नईमध्ये घातक H5N1 विषाणूमुळे १५०० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

Bird Flu : चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांत अत्यंत घातक ‘एच५एन१’ विषाणूने अंदाजे १,००० ते १,५०० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.
अड्यार, वेलाचेरी, तिरुवनमियूर आणि ईस्ट कोस्ट रोड या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा संसर्ग पसरला आहे.
तामिळनाडू सरकारने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने पावले उचलत जनतेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने देखील राज्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले आहे.
विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, जैव-सुरक्षा नियमांनुसार मृत कावळे आणि कुक्कुटपालनातील पक्ष्यांचे अवशेष जाळून टाकण्याचे किंवा जमिनीत खोलवर गाडण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
नागरिकांनी मृत पक्ष्यांना स्पर्श करू नये किंवा त्यांना हाताळू नये आणि कोठेही मृत पक्षी आढळल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चेन्नईच्या अड्यार भागातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर, केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने तामिळनाडूच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. पत्रात म्हटले आहे की, हा विषाणू अत्यंत घातक असून तो वेगाने पसरण्याची भीती आहे.
प्राणी आणि मानवी आरोग्यास असलेला धोका कमी करण्यासाठी याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. मानव आरोग्य आणि वन्यजीव अशा विविध क्षेत्रांना एकत्र घेऊन ‘वन-हेल्थ’ दृष्टिकोनातून या समस्येचे निराकरण करावे.
एच५एन१ अत्यंत धोकादायक मानला जातो, परंतु प्रामुख्याने विशिष्ट परिस्थितीत. पक्ष्यांमध्ये तो वेगाने पसरून मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवू शकतो. मानवांमध्ये याचा संसर्ग दुर्मिळ असला तरी, जेव्हा होतो तेव्हा तीव्र स्वरूपाचा असू शकतो. अनेक प्रकरणांमध्ये न्यूमोनियासारखे श्वसनाचे गंभीर आजार उद्भवतात आणि नियमित फ्लूपेक्षा याचा मृत्युदर जास्त असतो.






