Tamil Nadu CM: “आम्हाला हा ‘अभिनेत्यांचा पक्ष’ म्हटलं गेलं’ ; विधानसभेत विजय यांचा राजकीय ‘ब्लॉकबस्टर; विरोधकांवर तुफान हल्लाबोल
Tamil Nadu CM: तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर टीव्हीके (तमिळगा वेट्री कळघम) प्रमुख आणि मुख्यमंत्री थलपती विजय यांनी विधानसभेत आपले पहिले भाषण करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

Tamil Nadu CM: तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर टीव्हीके प्रमुख आणि मुख्यमंत्री थलपती विजय यांनी विधानसभेत आपले पहिले भाषण करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पक्षाच्या यशावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी टीव्हीकेच्या संघर्षाचा आणि जनतेने दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख केला.
“आमच्या संघर्षाची जाणीव फक्त कार्यकर्त्यांनाच” (Tamil Nadu CM)
विजय म्हणाले, “तमिळनाडूच्या जनतेचा विश्वास आणि प्रेम मिळवण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. आमच्या पक्षाने किती संघर्ष केला, हे फक्त आमच्या कार्यकर्त्यांनाच माहीत आहे. मात्र काही जण हे मान्य करण्याऐवजी आमच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते म्हणतात, ‘तो फक्त अभिनेता आहे आणि हा अभिनेत्यांचा पक्ष आहे.’
त्यांनी स्पष्ट केले की अशा टीकेचा त्यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होत नाही. “आम्हाला ३५ टक्के मते मिळाली आहेत. हे जनतेने दिलेले समर्थन आहे. अनेकांना वाटते की आम्ही सहजपणे सत्तेवर आलो, पण प्रत्यक्षात आम्हाला अनेक अडथळे, निर्बंध आणि षडयंत्रांचा सामना करावा लागला. त्या सर्वांवर मात करून आम्ही येथे पोहोचलो आहोत,” असे विजय म्हणाले.
“अनेक षडयंत्रांना तोंड दिले” (Tamil Nadu CM)
विधानसभेत बोलताना विजय यांनी पक्षाच्या प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, टीव्हीकेला सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा विश्वास यामुळे पक्षाने यश मिळवले. “आमचा प्रवास अजून संपलेला नाही. आम्हाला पुढे आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
चेंगराचेंगरीच्या घटनेवरही व्यक्त केली खंत
निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा उल्लेख करत विजय भावूक झाले. “त्या दुर्दैवी घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला. त्या वेदनेचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे. त्या घटनेची जखम माझ्या मनातून कधीही जाणार नाही. दुर्दैवाने काही लोक या घटनेसाठी आम्हालाच जबाबदार धरत आहेत. राजकारण इतके निर्दयी झाले आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
पहिल्याच निवडणुकीत टीव्हीकेची दमदार कामगिरी (Tamil Nadu CM)
२०२४ मध्ये स्थापन झालेल्या टीव्हीकेने २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. २३४ सदस्यीय विधानसभेत पक्षाने १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला.
स्पष्ट बहुमत न मिळाल्याने टीव्हीकेने काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत युती करत सरकार स्थापन केले. त्यानंतर १० मे रोजी थलपती विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या विजय यांनी ‘खुशी’, ‘थिरुमलई’, ‘घिल्ली’, ‘पोक्किरी’ आणि ‘सरकार’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता त्यांनी राजकारणातही आपली ताकद सिद्ध केली आहे.






