Bihar : कोण बनवणार सरकार, कोण आहे आवडता मुख्यमंत्री? ताज्या ओपिनियन पोलमधील धक्कादायक आकडेवारी

Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सी व्होटरने घेतलेल्या ताज्या ओपिनियन पोलमधून बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार आणि मुख्यमंत्रीपदासाठी कोणता नेता लोकप्रिय आहे, याबाबत जनतेचे मत समोर आले आहे. यंदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे का, याबाबतही या सर्वेक्षणातून महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.
एनडीए की महागठबंधन?
सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए गठबंधन सत्तेत कायम राहण्याची शक्यता आहे. या गठबंधनाला 40% मते मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील महागठबंधनाला 38.3% मते मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच बिहार विधानसभा निवडणूक लढवणारी प्रशांत किशोर यांची जन सुराज पार्टी 13.3% मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव पुढे –
मुख्यमंत्रीपदासाठी बिहारच्या जनतेने कोणत्या नेत्याला पसंती दिली, याबाबतही ओपिनियन पोलमधून मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना 36.20% लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दर्शवली आहे. प्रशांत किशोर 23.20% मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केवळ 15.90% लोकांनी पसंती दिली आहे, तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना 8.80% लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य मानले आहे.
बिहारच्या समस्या कोण सोडवणार?
बिहारच्या समस्यांचे निराकरण कोण करू शकेल, असा प्रश्न विचारल्यावर 36.5% लोकांनी महागठबंधनावर विश्वास दाखवला, तर 34.3% लोकांनी एनडीएच्या बाजूने मत व्यक्त केले. 12.8% लोकांनी जन सुराज पार्टीवर विश्वास दाखवला. विशेष म्हणजे, 9.4% लोकांचा असा विश्वास आहे की कोणताही राजकीय पक्ष किंवा गठबंधन बिहारच्या समस्या सोडवू शकणार नाही.
दरम्यान, बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागांसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर बिहारच्या जनतेने कोणाला कौल दिला, हे स्पष्ट होईल. या ओपिनियन पोलमधून बिहारच्या राजकारणात यंदा चुरशीची लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. एनडीए आणि महागठबंधन यांच्यातील काट्याची टक्कर आणि जन सुराज पार्टीच्या उदयामुळे बिहारच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





