“पिताजी पूर्णपणे ठीक, ते पुन्हा मुख्यमंत्री होतील”; नितीश कुमारांच्या पुत्राचे विरोधकांना सडेतोड उत्तर
Updated On:

पटना: बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी गेल्या काही काळात मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या प्रकृतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. एका रिसेप्शन पार्टीत सहभागी होण्यासाठी आलेल्या निशांत यांना मीडियाने नीतीश कुमार यांच्या प्रकृतीबाबत प्रश्न विचारला. तेजस्वी यादव यांनी सातत्याने नीतीश यांच्या प्रकृतीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या मुद्द्यावर निशांत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “पिताजी पूर्णपणे ठीक आहेत आणि पुढील पाच वर्षे अगदी सहजपणे सरकार चालवू शकतात. बिहारची जनता सर्व काही पाहते आहे, अंतिम निर्णय जनतेचाच असेल.”
नीतीशच पुढील मुख्यमंत्री –
बिहारमध्ये एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर निशांत म्हणाले, “नीतीश कुमार हेच बिहारचे पुढील मुख्यमंत्री असतील. संपूर्ण एनडीए पिताजींच्या पाठीशी आहे आणि ते पूर्णपणे स्वस्थ आहेत.” त्यांनी पुढे म्हटले, “भाजप का नाही बनवणार? नुकतेच अमित काकांनी (अमित शहा) याबाबत बोलून दाखवले आहे.” याशिवाय, सम्राट चौधरी यांनीही नीतीश कुमार हे गेल्या १५-१५ वर्षांपासून त्यांचे नेते असून, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल, असे स्पष्ट केल्याचे निशांत यांनी नमूद केले.
“राजकारणात येण्यापेक्षा एनडीएची सत्ता आणा”
निशांत यांना स्वतः राजकारणात येण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “मी राजकारणात येईन की नाही, तो मुद्दा सोडा. तुम्ही फक्त एनडीएची सत्ता आणा आणि पिताजींच्या नेतृत्वाला पाठिंबा द्या.”
“२२५ नव्हे, २०१० सारखा विजय मिळेल”
एनडीएने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत २२५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे, यावर निशांत म्हणाले, “२२५ जागाच कशाला? २०१० प्रमाणे जनता पिताजींना पुन्हा मोठा विजय मिळवून देईल!”





