Devendra Fadnavis । Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०३ जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३४ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे. अश्यातच, यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. बिहार विधानसभेतील एनडीएला मिळालेल्या यशाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मी बिहारच्या जनतेचे आणि सर्व मतदारांचे आभार मानतो. बिहारने पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. चिराग पासवास, मांझी अशी आमची युती होती, त्याला चांगला प्रतिसाद जनतेले दिला. यातून जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेचा असलेला विश्वास दिसून आला आहे.’ या निकालानंतर काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला बिहारच्या जनतेने उत्तर दिले आहे. ते संविधानिक संस्थांचा अपमान करत आहेत. ते अपमान थांबवत नाहीत तोपर्यंत त्यांची अवस्था अशीच असेल. काँग्रेसला आणि त्यांच्या मित्र पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांचे सर्व मुद्दे फेल ठरले आहेत. हे खोटारडे लोक आहेत, जोपर्यंत ते सत्य स्वीकारलं नाही, तर त्यांचे पतन सुरूच राहील. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय, बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा सर्वात कमी स्कोअर आहे. राहुल गांधींनी व्होट चोरीचा मुद्दा काढला, त्यावर यात्रा काढली, नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करुन बघितला. पण, लोकांचा विश्वास हा मोदीजी आणि नितीशकुमार यांच्यावर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाला आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे.