ST Bus : लालपरीचा प्रवास पुन्हा महागणार.! महामंडळाकडून ‘एसटी’ भाडेवाढीसाठी प्रस्ताव
आणखी एक महत्त्वाचा बदल प्रस्तावित केला आहे. सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे वाद टाळण्यासाठी एसटीचे तिकिट पाच रुपयांच्या पटीत ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

ST Bus – राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने १३.५० टक्के भाडेवाढीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
यंदा १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यानंतर या वाढीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आज संपत असल्यामुळे आता नवीन प्रस्तावानुसार एकूण भाडेवाढ १३.५० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
यावेळी आणखी एक महत्त्वाचा बदल प्रस्तावित केला आहे. सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे वाद टाळण्यासाठी एसटीचे तिकिट पाच रुपयांच्या पटीत ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोघांनाही सुट्या पैशांची अडचण कमी होईल, असा महामंडळाचा दावा आहे.
महामंडळाच्या म्हणण्यानुसार, कर्मचा-यांच्या वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये वाढ, डिझेलचे वाढलेले दर, टायर आणि बसच्या सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ यामुळेच वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आर्थिक खर्च भरून काढण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाचे मत आहे.
पण फक्त भाडेवाढ करूनही महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. मे महिन्यात एसटीचे वाहतूक उत्पन्न १,०४७.१७ कोटी रुपये होते, तर खर्च १,०९६.०७ कोटी रुपये झाला.
राज्यातल्या ३१ पैकी २२ विभागांना स्वत:चा खर्चही भागवता आलेला नाही. याआधी जानेवारी २०२५ मध्ये १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. आता प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नवीन दर तातडीने लागू होण्याची शक्यता आहे.






