Bihar Election 2025 : राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये एनडीएने बहुमताचा आकडा सहज पार केला. मात्र, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला असून जवळपास सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. राष्ट्रवादीने 15 उमेदवार बिहार विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. या 15 उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला आपल्या मतदार संघातून आघाडी घेता आली नाही तसेच 500 मतांचा टप्पा देखील गाठता आला नाही. असेच चित्र शेवटपर्यंत राहिल्याने सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या महत्त्वकांक्षेला सुरुंग लागला आहे. सध्याचे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष जेव्हा एकत्र होते, त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने देशभरात हातपाय पसरले होते. झारखंड, गोवा, गुजरात, केरळ, नागालँड आणि मेघालय या राज्यांमधून पक्षाचे आमदार आणि खासदार निवडून येत होते. तारिक अन्वर यांच्या रुपाने बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला होता. त्यामुळे अजित पवार यांनी हा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्याच्या आशेने बिहारच्या निवडणुकीत एनडीएसोबत फारकत घेऊन स्वत:चे उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरवले होते. परंतु, या सर्व उमेदवारांनी पार निराशा केल्याचे दिसत आहे.