दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवसापासून सुरू होणार परीक्षा!

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची लेखी परीक्षा दि. १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा दि. २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावी, दहावीची लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा घेण्यात येणार आहेत.
यात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहेत. माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षाही याच कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा दि. २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत.इयत्ता दहावीची लेखी परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठी व विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.
सोशल मीडियावरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका..
राज्य मंडळाकडून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. छापील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. सोशल मीडिया अथवा इतर माध्यमांमध्ये प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.





