लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ कारणामुळे खटला दाखल होणार

Uddhav Thackeray | Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
यामुळे आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे. तसेच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या विषयी निर्णय घेण्यात येईल.
भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातो, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.
भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती.
त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे नियम?
शेवटच्या 48 तासात ज्यावेळी कोड ऑफ कंडक्ट लागतो म्हणजे ज्या वेळी प्रचार संपतो आणि प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर एक तासाचा जो काळ असतो त्या काळात कोणीही प्रचार करायचा नसतो.
प्रतिक्रिया जरी दिली तरी त्यामध्ये मतदारांना मतदानाला येण्याचे आवाहन करता येते. मात्र थेट कोणत्या पक्षावर, व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नाही.





