नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहनांच्या इंजिनचा आवाज येत नसल्यामुळे अनेकदा पादचारी आणि इतर वाहनधारकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या येण्याचा अंदाज येत नाही. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लवकरच इलेक्ट्रिक वाहनांना त्यांच्या वेगानुसार कृत्रिम आवाज निर्माण करणारी यंत्रणा बसविणे बंधनकारक केले जाणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने अकॉस्टिक व्हेईकल अलार्मिंग सिस्टीम इलेक्ट्रिक वाहनांना लागू करणे बंधन करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. ही व्यवस्था सर्व इलेक्ट्रिक कार, बस, ट्रक आणि दुचाकींना लागू करण्याचा प्रस्ताव आहे. एक आक्टोबर 2027 पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणे अपेक्षित आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 26 पासून तयार होणार्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अशी आवाज निर्माण करणारी यंत्रणा आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावरील इलेक्ट्रिक वाहनांचे अपघात कमी होण्यास मदत होईल. यासंदर्भात अनेक पादचार्यांनी आणि संस्थांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे निवेदन सादर केले होते. त्या आधारावर हा निर्णय घेण्यात येत आहे. खरे म्हणजे इलेक्ट्रिक वाहन निर्माण करणार्या कंपन्यांनी अगोदरच अशा प्रकारची यंत्रणा सुरू करणे गरजेचे होते असे मत व्यक्त करण्यात येत आहे. किंबहुना काही वाहन उत्पादकांनी स्वतःच अशी यंत्रणा आपल्या वाहनात उपलब्ध केलेली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की 01 ऑक्टोबर 2026 पासून तयार होणार्या नव्या वाहनात ही व्यवस्था असेल. या अगोदरच विकलेल्या वाहनात 1 आक्टोबर 2027 पासून अशी यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना जार करण्यात आली आहे. अमेरिका, जपान आणि युरोपियन समुदायातील अनेक देशांमध्ये अशी यंत्रणा अगोदरच कार्यान्वित करण्यात आलेली आहे.