Bangladesh: बांगलादेशात राजकीय सत्तांतराचे वारे वाहत असतानाच आणि उद्या, १७ फेब्रुवारी रोजी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेणार असतानाच, भारत सरकारने सीमेवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय सागरी सीमा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या एका बांगलादेशी ट्रॉलवर भारतीय तटरक्षक दलाने झडप घालत २८ मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे. नेमकं प्रकरण काय? सोमवारी सकाळी भारतीय तटरक्षक दलाचे पथक बंगालच्या उपसागरात गस्त घालत होते. यावेळी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भारतीय जलक्षेत्रात एक संशयास्पद हालचाल दिसली. तटरक्षक दलाने या संशयास्पद ट्रॉलरला थांबण्याचा इशारा दिला. तपासणीअंती हा ट्रॉलर बांगलादेशचा असून त्याचे नाव ‘सागर ३’ असल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही वैध परवानगीशिवाय भारतीय सीमेत शिरल्याप्रकरणी तटरक्षक दलाने तात्काळ कारवाई करत ट्रॉलर जप्त केला आणि त्यावरील २८ जणांना ताब्यात घेतले. चौकशीत विसंगती आणि संशयास्पद हेतू – ताब्यात घेतलेल्या मच्छिमारांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांच्या उत्तरांमध्ये मोठी तफावत दिसून आली. आंतरराष्ट्रीय जलसीमा ओलांडून भारतीय क्षेत्रात येण्याचे कोणतेही ठोस कारण त्यांना देता आले नाही. तटरक्षक दलाने या २८ जणांना फ्रेजरगंज कोस्टल पोलिसांच्या स्वाधीन केले असून, पोलिसांनी त्यांना रीतसर अटक केली आहे. हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी बांगलादेशात स्वत: न जाता ओम बिर्लांना का पाठवले? जाणून घ्या 3 कारणे मोठे रॅकेट असण्याची शक्यता- सुंदरबनचे पोलीस अधीक्षक बिस्वा चंद ठाकूर यांनी सांगितले की, “हे केवळ मच्छिमार आहेत की एखाद्या मोठ्या घुसखोरीच्या रॅकेटचा भाग, याचा तपास सुरू आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे प्रयत्न झाले आहेत का, याचीही पडताळणी केली जात आहे.” गुप्त माहिती आणि रवींद्रनाथ दास कनेक्शन – प्राथमिक चौकशीत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या काही जणांच्या दाव्यानुसार, मासेमारीच्या बहाण्याने रवींद्रनाथ दास नावाच्या एका बांगलादेशी नागरिकाला गुपचूप भारतीय हद्दीत सोडण्याची त्यांची योजना होती. तो या ट्रॉलरमध्ये लपून बसला होता, परंतु तटरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला. सीमेवर हाय अलर्ट – बांगलादेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सागरी सीमेवर पाळत वाढवण्यात आली आहे. उद्या तारिक रहमान यांचा शपथविधी होत असताना सीमेवरील ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.